ग्रंथ विक्री व्यवसाय
ग्रंथ विक्री ही एक कलाही आहे. हा व्यवसाय उत्तम चालण्यासाठी विक्रेत्यालाही वाचनाची आवड व वाचनाचे महत्त्व माहित असले पाहिजे. ग्रंथांसंबंधीचे त्याचे ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. ग्राहकांविषयी त्यास आदरयुक्त जिव्हाळाही पाहिजे.प्रकाशित ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्रंथविक्री-व्यवसायाद्वारे केले जाते. मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ग्रंथाची निर्मिती वाढली. त्याबरोबरच पुस्तकविक्रेत्यांची दुकानेही वाढली. खेडोपाडी पुस्तकविक्रीची दुकाने चालणे शक्य नव्हते. त्यामुळे शहरात ही दुकाने दिसू लागली.

शाळा सुरू होण्याच्या वेळी इतर माल विकणारे व्यापारी आपल्या दुकानात पुस्तके विकायला ठेवीत. धार्मिक ठिकाणी फिरते व्यापारी धार्मिक पुस्तके, लावण्या-पोवाड्यांचे संग्रह, भजने, पोथी अशा प्रकारची पुस्तके विकत. याबरोबरच इतर वस्तूंचीसुद्धा ते विक्री करीत. पुढे शाळांची संख्या वाढल्याने पुस्तकांनाही मागणी वाढू लागली. ही मागणी फक्त क्रमिक पुस्तके व मार्गदर्शिका यांनाच असायची
नागपूर, कोल्हापूर, सोलापूर वगैरे ठिकाणी इ.स. १९२० ते १९५० या काळात पुस्तकांची विक्री होऊ लागली. तेथेही पुस्तकविक्रीचा धंदा हा जोडधंदा म्हणूनच चालायचा. केवळ त्याच व्यवसायावर उदरनिर्वाह होण्याची शक्यता नव्हती; किंबहुना आजही ती नाही. आजही ग्रामीण भागात लोखंडी सामान, औषधे, कापड वगैरे वस्तूंच्या दुकानांतून जोडधंदा म्हणून पुस्तकांची विक्री होत असते.
स्वातंत्र्योत्तर भारतात या व्यवसायाला चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली. शाळा, महाविद्यालये वाढल्याने पालकांना पुस्तके विकत घेण्यावाचून पर्याय नव्हता. पुढे पुस्तकविक्रेत्यांच्या संघटना अस्तित्वात आल्या. ‘फेडरेशन ऑफ बुकसेलर्स अँड पब्लिशर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या नावाची एक मध्यवर्ती संस्था देशात चांगले काम करीत आहे.घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि जुन्या दुर्मिळ पुस्तकांचे विक्रेते असे भारतातील पुस्तक विक्रेत्यांचे वर्गीकरण केले जाते. घाऊक विक्रेते मोठमोठ्या शहरातच असतात. दुर्मिळ व जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांना परिश्रम पुष्कळच करावे लागतात.

दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वह्या, क्रमिक पुस्तकांची विक्री, मार्गदर्शिका हाच ग्रंथविक्रेत्याचा आधार असतो. ज्ञानप्रसारासाठी सध्या सरकार ग्रंथालयांना प्रोत्साहन देत आहे. येथे माफक दरात पुस्तक वाचण्यास मिळत असल्याने वाचकांची संख्याही वाढत आहे. वाचनाची आवड असणारे, पुस्तक विकत घेण्याची हौस असणारे परंतु पुस्तक विकत घेण्याची इच्छा असूनही त्यांची खरेदी न परवडणारे लोक आपल्याकडे आहेत.
कोणत्याही खेड्यात केवळ पुस्तकाचेच दुकान सापडणार नाही. पुस्तकविक्रीचा धंदा फारसा फायदेशीर ठरत नाही. जोडधंदा म्हणूनच तो योग्य ठरतो. पाश्चात्त्य देशांत मात्र पुस्तक विक्रेत्यांची प्रचंड दुकाने दृष्टीस पडतात. त्यांचा परदेशांतही व्यापार चालतो.
ग्रंथ विक्री होण्यासाठी प्रसार माध्यमामधून ग्रंथपरीक्षणे प्रकाशित व्हायला हवीत. निश्चित ग्राहक मिळण्याची ती एक संधी असते. ग्रंथविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नेहमीच वाढते खर्च, न खपलेल्या पुस्तकांची आर्थिक जबाबदारी, इ. अनेक अडचणी भेडसावत असतात. सरकारने या व्यवसायाला उद्योग म्हणून मान्यता द्यायला हवी. टपालाच्या दरात सवलती द्यायला हव्यात. तरच हा व्यवसाय उत्तम चालेल. काही राज्यांमध्ये पुस्तकावर विक्री कर, तसेच अनेक ठिकाणी स्थानिक कर असून ते रद्द होणे आवश्यक आहे.