
अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती विद्येची देवता असून तो सुखकर्ता, दुःखहर्ता व रक्षणकर्ता आहे. अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊर हे पुण्यातील एक स्थळ असून येथे ‘कदंब’ वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला ‘चिंतामणी’ म्हणतात. पुण्यातील पेशवे घराण्यातील मंडळी थेऊरला दर्शनासाठी सतत जात असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते.
माधवराव पेशवे यांनी थेऊरचा विस्तार केला. माधवरावांचे निधन थेऊरलाच झाले. याठिकाणी माधवरावांबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी आहे. या मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित कलात्मक दालन आहे. थोरल्या माधवरावांची स्फूर्तीदायक कारकीर्द या दालनात दिसते. येथील श्री विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.

या मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. कपिल मुनींजवळ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे ‘चिंतामणी’ नावाचे रत्न होते. गणासूर एकदा त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नांच्या सहाय्याने त्यास पंचपक्वानांचे भोजन दिले. हे पाहून गणासूर आश्चर्यचकित झाला. त्याच्या मनात त्या रत्नाविषयी मोह निर्माण झाला. त्याने कपिलमुनींकडे त्या रत्नाची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार देताच त्याने त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले. कपिलमुनींनी विनायकाची उपासना केली. विनायक प्रसन्न झाले; व गणासुराचे येथे कदंब वृक्षाखाली पारिपत्य केले. कपिलमुनींनी परत मिळालेले रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. त्यामुळे येथे विनायकास ‘चिंतामणी’ असे संबोधले जाऊ लागले. या नगरीस ‘कदंबनगर’ म्हणू लागले.
चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. थेऊर पुण्यापासून ३० कि. मी. अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी पुण्यापासून बसेसची सोय आहे. हे क्षेत्र मुंबईपासून १९१ कि.मी. वर आहे. थेऊरपासून जवळच उरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.