
डहाणूचा किल्ला भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू हे एक गाव आहे. डहाणू खाडीच्या तटावर हा पुरातन किल्ला आहे. डहाणू हे निसर्गरम्य प्रसिद्ध बंदर आहे. खाडीच्या मुखाजवळ हा किल्ला असून या किल्याला उंच तटबंदी आहे. गडावर प्रवेश केल्यावर ध्वजस्तंभ असलेला बुरुज लक्ष वेधून घेतो. या बुरुजाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हा किल्ला खूप जुना असून किल्याची एकूण अवस्था फारशी चांगली नाही.
इ.स. १५३३ मध्ये पोर्तुगीजांनी डहाणू बंदर ताब्यात घेतले तेव्हा येथे गड बांधला. इ.स.१५८२ मध्ये मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पोर्तुगीज कॅप्टन ‘नोसासेन्होरा’ याने हा किल्ला नव्याने बांधून मनोरे, तटबंदी व भक्कम बुरुज बांधले. पेशवेकाळात मराठ्यांनी स्वारी करून राणोजी शिंदे यांनी इ.स. १७३९ मध्ये डहाणू जिंकले. काही काळ डहाणूवर इंग्रजांचा ताबा होता. पुन्हा त्याचा ताबा मराठ्यांकडे आला. इ.स. १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या तहामुळे डहाणू किल्ला पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. इ.स. १८८८ पासून येथे सरकारी कचेरी सुरु झाली. ती स्वातंत्र्यानंतर आजही आहे.

पोर्तुगिजांनी इ.स. १५३३-३४ मध्ये हा किल्ला बांधला. मुघलांनी इ.स. १५८२ मध्ये त्यावर आक्रमण केले होते. ते परतवले गेले. सन १७३९ च्या मोहिमेत चिमाजीआप्पांनी या परिसरातून पोर्तुगिजांचे बस्तान उठवले. त्याबरोबर हा किल्लाही मराठ्यांकडे आला. सन १८१८ च्या इंग्रज-मराठा करारानंतर डहाणूचा किल्ला इंग्रजांकडे गेला.
डहाणूच्या या किल्ल्याला दोन प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशदार उत्तर दिशेकडे आहे. चार भक्कम बुरुज गढीची उत्तम सुरक्षा करतात. प्राचीन काळी डहाणू हे एक मोठे बंदर होते. नाशिकच्या गुहांमध्ये डहाणू शहर व नदीचा उल्लेख सापडतो.