
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अशेरीगड हा एक किल्ला आहे. पालघरमधील डोंगररांगांमध्ये हा किल्ला विसावलेला असून तो फार जुना आहे. याचा आकार मोठा असल्याने हा गड बुलंद वाटतो.
भोजराजाने हा किल्ला बांधला असा उल्लेख आहे. हा शिलाहारवंशीय राजा होता. इ.स. १४ व्या शतकात ‘महिकावती नगरी’ येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला. या गडाचा उत्तम बंदोबस्त केला. पुढे पोर्तुगीजांनी वसईत साम्राज्य बसविले. इ. स. १५५६ साली त्यांनी अशेरीवर हल्ला करून तो ताब्यात घेतला. या किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेऊन पोर्तुगीजांनी या गडाच्या मजबुतीकडे अधिक लक्ष दिले. संभाजी महाराजांनी ‘अशेरीगड’ जिंकून स्वराज्यात सामील केला. ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून इ.स. १७३७ च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला. इ.स. १८१८ नंतर ‘अशेरीगड’ इंग्रजांच्या ताब्यात गेला.

या गडाचे पठार प्रशस्त असून या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष, चर असलेले अनेक चौथरे, पाण्याची कुंडे आढळतात. गडावर गुहा असून ती रूंद तोंडाची व मध्यम आकाराची आहे. भिरभिरणाऱ्या वाऱ्यापासून व कडाक्याच्या थंडीपासून सुरक्षा देण्याच्या दृष्टीनेच ती बांधण्यात आली आहे. इथे आत व बाहेर पहारेकऱ्यांना झोपण्यासाठी दगडी पलंग केलेले आहेत. हे पलंग फार आकर्षक आहेत. काळाच्या ओघात येथील अनेक गोष्टी लुप्त झाल्या तर काही अवशेष शिल्लक आहेत.
गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. या गडावर जायचे झाल्यास आधी ‘खोडकोना’ या गावी जावे लागते. याच गावातून गडावर जाण्यासाठी वाट आहे.