
नातेसंबंध कसे जपावेत, हे रामायणातून समजते. सत्य नेहमीच जिंकत असल्याने चांगले असणे व्यक्तीच्या हिताचे आहे. प्रभू श्रीरामांनी लहानपणापासून त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या आणि त्या पेलल्या. व्यक्तीला जीवनात वेगवेगळ्या भूमिका स्वीकाराव्या लागतात. श्रीरामांचा बोध घेऊन व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या पाहिजेत. नात्याला वेळ दिला पाहिजे.
श्रीरामांच्या आयुष्यात वाईट काळ आला. मानसिक खच्चीकरण करणाऱ्या वनवास, सीतेचे अपहरण, सीतेचा त्याग इत्यादी घटना आयुष्यात आल्या तेव्हा ते न खचता त्यातून मार्ग काढत पुढे जात राहिले. संयम, शिस्तबद्धता अशा गुणांनी व्यक्ती आनंदी राहते. श्रीरामांचा शांत स्वभाव, प्रत्येकाबद्दलचे प्रेम-आदर, क्षमाशीलता हे गुण व्यक्तीने अंगीकारायला हवेत. या गुणांनी व्यक्ती महान बनते. नातेसंबध टिकतात.

अलीकडे नात्यांमधील गुंतागुंत फार वाढली आहे. निकोप व निर्मळ नात्यांसाठी श्रीरामांच्या स्वभावातील पैलू आत्मसात करावेत. नाती जपावीत, ती टिकवावीत. भारतीय संस्कृतीतील हे थोर महापुरुष, त्यांचे आचरण हे संस्कृतीला योग्य दिशेने नेण्यासाठीचे मोठे आदर्श आहेत. रामायण हे केवळ मनोरंजनासाठी वाचणे किंवा पाहण्याचे साधन नसून नाती व कुटुंबव्यवस्था याचे महत्त्व सांगणारे पवित्र माध्यम आहे. म्हणून भारतीय संस्कृती जपण्यासाठी नाती जपायला हवीत.