
‘वेळास’ हे कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात हे एक छोटेसे गाव आहे. या गावाला दीड किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याने त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करून ती जपली आहे.या किनाऱ्यावर दरवर्षी समुद्री कासवे अंडी घालतात. येथे वर्षातून एकदा भरणाऱ्या ‘कासव महोत्सवा’त आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होते.
हा किनारा हिरवागार परिसर, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी व मुबलक सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध ‘कासव महोत्सवासा’साठी देखील हा किनारा ओळखला जातो. दिवाळीच्या दरम्यान मादी कासव किनाऱ्यावर येऊन अंडी घालून जायची. या अंड्यांची विल्हेवाट माणसे, इतर प्राणी लावून मोकळे व्हायचे.

चिपळूणमधील ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा त्यांनी वन विभागाच्या सहकार्याने पुढाकार घेऊन सन २००६ मध्ये पहिला कासव महोत्सव घेण्याचे ठरविले. त्यांनी ‘कासव संवर्धन मोहीम’ सुरु केली. सन २००७ मध्ये तीन दिवसांचा, सन २००८ मध्ये सात दिवसांचा ‘कासव महोत्सव’ घेण्यात आला. वेळास येथे गावातील ८० टक्के लोक ‘कासव महोत्सवा’वर अवलंबून आहेत. पहिल्या महोत्सवात १२५ पर्यटकांनी भेट दिलेल्या गावात आज ‘कासव महोत्सवा’ला सुमारे पाच ते सहा हजार पर्यटक भेट देतात. ‘वेळास’ हे गाव आज ‘कासवांचे गाव’ म्हणून सगळीकडे ओळखले जाते.
या किनाऱ्यावर पर्यटक सूर्यस्नान, पोहणे, नौकाविहारचा आनंद घेऊ शकतात. हा समुद्रकिनारा टेकड्यांनी आणि हिरव्यागार वनस्पतींनी वेढलेला आहे. आराम आणि विश्रांतीसाठी हे एक शांत ठिकाण आहे.