वाहन निर्मिती उद्योग
भारतामध्ये जे उद्योग महत्त्वाचे मानले जातात, त्यामध्ये स्टील, सिमेंट आणि वाहन उद्योग यांचा समावेश आहे. वाहन उद्योग हा भारताच्या आर्थिक वृद्धीला चालना देणारा प्रेरक घटक मानला जातो. या उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन अर्थकारण चालते. भारतातील सर्वात मोठे वाहन निर्मिती केंद्र महाराष्ट्रातील पुणे हे आहे. येथे हा उद्योग चांगल्या प्रकारे स्थिरसावर झाला आहे. पुण्याला सर्व प्रकारच्या वाहन उद्योगांचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. गेल्या काही दशकांत वाहन उद्योगाची येथे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मोटारगाड्या, ट्रक, जीप, दुचाकीबरोबरच ट्रॅक्टर्ससारखी कृषी उपकरणे पुण्यात तयार होतात. वाहन निर्मितीमध्ये भारत जगात सहावा आहे. यामध्ये महाराष्ट्राचा व पुणे जिल्ह्याचा खूप मोठा वाटा आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास सुमारे ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाहने पुण्यात तयार होतात. पुणे हे भारतातील सर्वात मोठे वाहन निर्मिती केंद्र आहे. येथे वाहन निर्मितीच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया-पुणे, ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट-पुणे, होरिबा इंडिया टेक्निकल सेंटर, पुणे या ३ प्रमुख संस्था आहेत.
एकट्या पिंपरी-चिंचवड क्षेत्रामध्येच ४००० हून अधिक उत्पादन उद्योग व उत्पादन सहाय्यक उद्योग आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये पुण्यातील पिंपरी-चिंचवड, चाकण-तळेगाव आणि रांजणगाव औद्योगिक क्षेत्र देशातील सर्वात मोठे ‘ऑटोमोबाइल हब’ बनले आहे.
महाराष्ट्राच्या गुंतवणुकीला अनुकूल उपक्रम येथे आहेत. यामुळे टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या ऑटोमोबाइल ब्रँडचे या पट्टय़ात प्लांट्स आहेत. जीएम, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्याही येथे सुविधा आहेत. राज्यात सहज उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ असल्याने येथे हा उद्योग फोफावून लाखो लोकांना रोजगार मिळाला. भारतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आणि अनेक महाविद्यालये व विद्यापीठे असलेले शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून पुणे आधीच प्रसिद्ध आहे.

भारतीय वाहन उद्योग हा जगातील मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. भारतीय वाहन उद्योगाचा भारताच्या जीडीपी मधील वाटा ७.१ टक्के असून भारताच्या उत्पादन क्षेत्रातील वाटा जवळपास ४९ टक्के आहे. ५० वर्षापेक्षा जुन्या असलेल्या या व्यवसायाची मुहूर्तमेढ टाटा समूह, फिरोदिया समूह यांनी रोवली. वाहन उत्पादकांना सुट्या भागांचा पुरवठा करणारे व्हेंडर्स, वाहनांची दुरुस्ती करणारे छोटे कामगार, विमा व्यावसायिक, वाहनांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्था, इंधन विक्रेते, सुट्या भागांचे उत्पादक आणि विक्रेते, या सगळ्या व्यवसायात काम करणारे अधिकारी व कामगार यांची संख्या पाहिली असता हा उद्योग फार मोठा असल्याचे लक्षात येते.
एकीकडे वस्तूचे उत्पादन वाढत असताना त्याची विक्री त्या प्रमाणात वाढत नसेल तर त्याचे गंभीर परिणाम होतात. कोणताही वाहन उत्पादक आपल्या वाहनाची थेट विक्री करीत नाही. त्यासाठी देशभरात डीलर्स असतात. या डिलर्सना कंपनीकडून वाहनांची खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्थाकडून कर्जरूपाने भांडवल उभे करावे लागते. उत्पादकांकडे वाहनांची संख्या वाढली की साहजिकच विक्री विभागाचा दबाव डिलर्सवर येतो. त्यांना साठा करावा लागतो; मात्र हा साठा लवकर विकला गेला नाही तर कर्जाचा बोजा आणि व्याज वाढत राहते. परिणामी, वाहने उत्पादकांकडे पडून राहतात. भांडवल अडकून पडते. हा सगळ्यात मोठा प्रश्न वाहन उद्योगासमोर अनेक वेळेस उभा राहतो. वाहन उद्योगासाठी अर्थव्यवस्थेत तेजी आली पाहिजे. त्यासाठी असंघटीत वर्गाकडे पैसा आला पाहिजे. या उद्योगांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली, तर नक्कीच हा उद्योग जोमाने वाढू शकतो.