बहुपयोगी एरंड
एरंड हे बहुपयोगी व्यावसायिक पीक आहे. एरंडाच्या बियांपासून तेल तयार केले जाते. हे तेल औषधी असून विविध प्रकारचे शारीरिक विकार बरे करण्यासाठी वापरले जाते. बाळाच्या मसाजासाठीसुद्धा हे तेल फायदेशीर आहे. या तेलामुळे बाळाची हाडे मजबूत होतात. याशिवाय कापडाचा रंग आणि साबण बनविण्यासाठीही याचा वापर होतो.

एरंडाचे तेल साठवणे सोपे आहे. शून्य तापमानातही ते गोठत नाही. शेतकऱ्यांना हे तेल चांगला भाव मिळवून देते. एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती आहे. ही मूळची आफ्रिकेतील असून बहुतेक उष्ण प्रदेशातील देशांमध्ये आढळते. भारतात सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते. काही भागात तर ही वनस्पती लागवडीशिवायही वाढलेली आढळते. एरंडाच्या लागवडीसाठी जास्त संसाधने लागत नाहीत. ते कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या हवामानात लावले जाऊ शकते. एरंडाचे झाड उंचीने लहान असून त्याची उंची ३ ते ५ मी. असते. त्याचे खोड ठिसूळ असते. पाने साधी, दातेरी काठाची आणि देठ लांब असतात. पानाच्या खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखाडी छटा दिसते. जर व्यावसायिक दृष्टीने एरंड लागवड केली, तर शेतकरी ज्या शेतात हे पीक घेत असेल तिथे पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने व्हायला हवा. सामान्य, दमट किंवा कोरड्या तापमानात एरंड वनस्पतीच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही.
इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत एरंडाची लागवड खूपच स्वस्त आहे. तज्ज्ञांच्या मते, एक हेक्टर क्षेत्रात 25 ते 30 हजार रुपयांमध्ये एरंड लागवड करता येते.

एरंडाच्या बिया तेल बनविण्यासाठी वापरतात. तज्ज्ञांच्या मते, प्रति हेक्टर एरंड पिकविण्यासाठी सुमारे 20 किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी शेतकऱ्याने शेताची दोन ते तीन वेळा नांगरणी व्यवस्थित करावी. शेतात तण होऊ देऊ नयेत. हे पीक लागवडीनंतर 120 ते 130 दिवसांत काढणीसाठी तयार होते.
एरंड पिकातील तणांचे व्यवस्थापन सुरुवातीलाच करावे. तण वेळोवेळी काढून टाकावे. याशिवाय तण नियंत्रणासाठी पेरणीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एक किलो ‘पेंडीमेथालिन’ 600 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यासही तण नियंत्रणास मदत होते. एरंडेल शेती व्यवसायात 40 दिवसांनी एकदा तण काढणे आवश्यक आहे.
एरंडेल तेल विदेशातही निर्यात केले जाते. हे तेल बाजारात शेतकऱ्यांकडून सरासरी 5400 ते 7300 रुपये प्रतिक्विंटल दराने विकत घेतले जाते. शेतकऱ्याने एक हेक्टरमध्ये 25 क्विंटल तेलाचे उत्पादन केले तरी ही फायदेशीर शेती आहे. त्यामुळे त्याला 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंतचा नफा सहज मिळू शकतो.