
पर्यटकांचे हे एक आकर्षण ठरले आहे. या अरण्यात गव्यांचे कळपच्या कळप दिसतात. त्याचबरोबर हरिण, सांबर, चितळ यांचेही कळप तसेच साळींदर, अस्वले, साप, नाग यांचेही दर्शन होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरकडे ‘पर्यटन विकास केंद्र’ म्हणुन लक्ष केंद्रीत केले आहे.
राधानगरी जलाशयाचा नैसर्गिकरित्या उपयोग करून येथे अद्ययावत असे विश्रामगृह उभारण्याचे काम केले आहे. या परिसरात गगनगिरी महाराजांचा मठ असून हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्सिजन पार्क’ अशी ओळख दाजीपूर अभयारण्याची आहे. पश्चिम घाटातील हा पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसर आहे.
या अभयारण्याचा निमसदाहरित जंगलप्रकारात समावेश होतो. राधानगरीचा ‘लक्ष्मी तलाव’ आणि ‘काळम्मावाडी’ धरणाभोवतालच्या परिसराचा विस्तार होऊन याची ओळख ‘राधानगरी अभयारण्य’ अशी झाली आहे.

प्रचंड प्रमाणात पाऊस असणाऱ्यायेथील घनदाट जंगलांचे पट्टे ‘डंग’ म्हणून ओळखले जातात. डोंगरमाथ्यावर जांभा खडक आढळतात. त्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, फुले, नेचे, बुरशी आढळतात. साग, शिसव, सावर, फणस, आंबा, जांभूळ, पळस, पांगिरा, अंजन, खैर, कारवी आदी काही नावे सांगता येतील. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरुडशेंग, बाघाटी, सर्पगंधा, धायटी आदी झुडुपे व वेली आहेत. पर्यावरणासाठी महत्त्वाचा ‘देवगांडूळ’ हा दुर्लक्षित असलेला प्राणी येथे आहे. फुलपाखरांच्या १२१ प्रजातींची येथे नोंद आहे. ‘सदर्न बर्डविंग’ हे देशातील सर्वांत मोठे फुलपाखरू येथे असून ‘ग्रास ज्युवे हे सर्वात लहान फुलपाखरू येथे आढळते.
एकूणच, या अभयारण्याची शान गेल्या कित्येक वर्षांपासून वाढतच आहे.