
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे. दिनांक ८ ऑगस्ट १९५७ ला या महामंडळाची स्थापना झाली. औद्योगिक व कृषी क्षेत्रासाठी तसेच अन्नधान्याची नासाडी होऊ नये याकरिता साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली. आजमितीस एकूण १९३ ठिकाणी महामंडळाच्या वखार केंद्राचे जाळे असून स्वमालकीच्या एकूण ८३० गोदामांमधून १३ लाख ५० हजार मेट्रिक टन मालाची साठवणूक करता येते. महामंडळाची छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, लातूर, पुणे, कोल्हापूर येथे विभागीय कार्यालये आहेत.
केंद्रीय वखार महामंडळाच्या पूर्वपरवानगीने राज्यात ठिकठिकाणी वखार अर्थात गोदामे बांधणे, राज्यात ठिकठिकाणी शेतीमाल, बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे व ठरवून दिलेल्या मालाच्या साठवणुकीकरिता वखार केंद्र चालविणे, केंद्रीय वखार निगम व शासन यांच्यातर्फे शेतीमाल व शेतीनिविष्ठा यांची विक्री करणे, साठवणुक व वितरण याबाबतीत शासन प्रतिनिधी म्हणून काम पाहणे, याबाबत शासनाच्या सुचनेनुसार विहीत केली जातील, अशा कामांची कार्यवाही करणे, इत्यादी कामे या महामंडळास पार पाडावी लागतात.

सन १९५७ मध्ये महामंडळाची स्थापना झाल्यानंतर प्रथम महामंडळाने भाडयाची गोदामे घेऊन त्यामध्ये साठवणुकीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर महामंडळाने गोदाम बांधकाम कार्यक्रम हाती घेतला. स्वमालकीच्या दोन गोदामांमधून २७२० मेट्रिक टनाची साठवणूकक्षमता सन १९६१-६२ मध्ये निर्माण केली. तेव्हापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी महामंडळाने व्यवसायानुरूप साठवणूक क्षमतेचे गोदाम बांधकाम हाती घेतले. महाराष्ट्रात स्वमालकीच्या गोदामांची सोय केली.