
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका सागरकिनाऱ्यानीही समृद्ध आहे. येथील मिठबाव किनारा असाच नितांतसुंदर आणि देखणा आहे.
‘गजबा’ देवीच्या आशीर्वादाने पुलकित झालेला हा सागरतीर आहे. येथील स्थानिक तसेच आधी येऊन गेलेले पर्यटक संध्याकाळच्या वेळेला येथील मंदिरापाशी जाऊन बसतात. फेसाळणाऱ्या लाटांचे विहंगम दृश्य पाहतात. मावळतीच्या वेळेला येथे बसणे म्हणजे सुखाची अनुभूतीच असते.

मिठ्बावला केवळ समुद्रांच्या लाटाच नव्हे तर ‘नारिंग्रे’ नदीचा शांत प्रवाहसुद्धा मंत्रमुग्ध करतो. स्वच्छ पांढरी वाळू, हिरव्यागर्द वृक्षांची निसर्गरम्यता यामुळे या किनाऱ्यावरून लवकर जाऊ नये, असे येथे जाणाऱ्यास वाटते. येथील स्थानिक खाद्यसंस्कृतीची चव येथे चाखता येते. पर्यटकांची येथे फारशी वर्दळ नसते. सुट्टीच्या दिवसात देवगडमधील चाकरमानी या किनाऱ्यास आवर्जून भेट देतात.