
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘रामगड’ हे गाव असून येथे ‘रामगड’ किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, असे म्हणतात.
या रामगड किल्ल्याचा दरवाजा अंदाजे ८ फूट उंच आणि किल्ल्यावरील १५ बुरुजांची उंची सुमारे १८ फूट असेल. येथे पहारेकऱ्यांसाठी असलेल्या देवड्या स्पष्टपणे दिसतात. जवळच दुसरा दरवाजा आणि चोर दरवाजासुद्धा आहे. गडनदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सामरिक वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधला गेला असावा. या किल्ल्यावर अर्धगोलाकार बुरुज असून तोफांचा मारा करण्यासाठी झरोके आहेत. किल्ल्याच्या आत ‘होळीचा माळ’ नावाचा मोकळा भाग आहे. तिथून पुढे चालत गेले की बालेकिल्ला दिसतो. या किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. या किल्ल्याची पडझड झालेली आहे. एका बाजूने भिंत ढासळलेली असली तरीही आत जाता येते. बालेकिल्ल्यात अतिशय मनोहर गणेशमूर्ती आहे.

येथे पुरलेल्या ७ तोफा दिसत असून मोठे तुळशी वृंदावन आहे. थोडे पुढे गेले की होळीवाडीच्या दिशेने उतरणारा दरवाजा दिसतो. किल्ल्याच्या या बाजूला गडनदी आहे. हा किल्ला पर्यटकांपासून मात्र वंचित आहे.