डबाबंदीकरण व्यवसाय
कोणताही खाद्यपदार्थ व्यवसाय करताना तो पदार्थ फार दिवस टिकणे ही महत्त्वाची बाब असते. पदार्थ टिकविण्यासाठी तो स्थायू अवस्थेत असल्यास हवाबंद डब्यात आणि द्रावण असल्यास बाटल्यांमध्ये भरून ठेवले जाते. पदार्थ विक्रीस पाठविण्यापूर्वी उत्तम प्रकारे वेष्टनात गुंडाळून तो हवाबंद केला जातो. याला ‘डबाबंदीकरण व्यवसाय’ असे म्हणतात.

या व्यवसायात उष्णतेने डब्याचे आणि खाद्यपदार्थाचे निर्जंतुकीकरण करण्याच्या क्रियेला प्राधान्य दिले जाते. डबाबंदीकरणाने पदार्थ नासविणाऱ्या जंतूंचा नाश केला जातो. यामुळे पदार्थाला होणारा बाहेरील जंतूंचा संसर्ग टाळला जातो. खाद्यपदार्थ टिकविण्याच्या अनेक पद्धती आहेत. शीतगृहातील साठवण आणि निर्जलीकरण या दोन पद्धती या प्रक्रियेत वगळल्या जातात.
फळे, भाज्या, मासे, मांस, दूध आणि दुधाचे पदार्थ इ. लवकर नाश होणारे पदार्थ हवाबंद डब्यात भरले जातात. डबाबंदीकरण हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतीच्या प्रगतीस या व्यवसायाने हातभार लावला आहे. या व्यवसायामुळे फळे, भाज्या दीर्घकाळ टिकतात आणि त्या आर्थिक मिळकत करून देतात. काही फळे, भाज्या या फक्त विशिष्ट हंगामात उपलब्ध होतात. डबाबंदीकरणामुळे अशी फळे व भाज्या हंगाम नसतानाही उपलब्ध होऊ शकतात.

भारतात सन १९६० नंतर या व्यवसायामुळे फळे आणि भाज्या उत्पादकांस योग्य भाव मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास शेतकऱ्यांना उत्तेजन मिळाले आहे. डबाबंदीकरणात शिल्लक राहिलेल्या खाद्यपदार्थांचा उपयोग होत असल्यामुळे त्यांचे भाव स्थिर होण्यासही मदत होते. ग्राहकांना आवडतील असे खाद्यपदार्थ निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
जागतिक उद्योग क्षेत्राचा विचार करता भारतात या व्यवसायाची सुरुवात बरीच उशीरा झाली. लोणची व चटण्या बनविणारे काही कारखाने सुरुवातीला बाहेरील देशात आपला माल निर्यात करीत असत. महाराष्ट्रात हवाबंद डब्यातून हापूसचे आंबे निर्यात करण्याच्या उद्देशाने काही कारखाने काढण्यात आले आहेत. अलीकडे या कारखान्यांमध्ये वाढ झाली असून ते चांगल्या पद्धतीने भरभराटीस आले आहेत.