पदार्थाला तडका देणारी मोहरी
पदार्थाला तडका देऊन चव वाढविणारी मोहरी फोडणीच्या तेलात तडतडली की सुरेख वास दरवळतो. मोहरीला हिंदीत ‘राई’, ‘बनारसी राय’, ‘काले सरसों’ म्हणतात. गुजरातीत ‘राई’, काश्मिरीत ‘सरिसा’, तेलुगुमध्ये ‘अवलु’, तमिळमध्ये ‘कडुगो’, मल्याळममध्ये ‘ कडुकू’, तर कन्नडमध्ये ‘सावे’ या नावाने ओळखली जाते.

भारत मोहरी तेलाच्या लागवडीत जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. तसेच, मोहरी पिकाचा एकूण तेलबिया उत्पादनात 28.6% वाटा आहे. त्यामुळे मोहरी हे भारतातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. शिवाय, मोहरीच्या रोपांचा हिरवी पालेभाजी म्हणून वापर केला जातो. मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. गहू, बार्ली, हरभरा, बटाटा इत्यादींसोबत मोहरीची लागवड केली जाते. याला आंतरपीक असे म्हणतात.
मोहरीच्या बिया भारतात भाज्या, आमटीसाठी मसाला म्हणून वापरल्या जातात. मोहरीचे तेल काढल्यानंतरची पेंड गुरांसाठी उत्तम खाद्य आहे.
मुख्यतः राजस्थानमध्ये मोहरीची शेती प्राचीन काळापासून केली जाते. यासह मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही मोहरीचे पीक लोकप्रिय आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशसह भारताच्या दक्षिण भागातील शेतकरी मोहरीचे पीक घेतात. आसाम, बिहार, ओडिशा व पश्चिम बंगालमधील रब्बी पिकांचा ‘पिवळा हंगाम’ म्हणून उल्लेख आहे.

मोहरीची लागवड उपोष्णकटिबंधीय हवामानात सुरू होते. कोरड्या व थंड हवामानात मोहरीची लागवड चांगली होते. मोहरी पिकवण्याचा हंगाम हा प्रामुख्याने रब्बी पीक म्हणून ओळखला जातो. मोहरीसाठी दवमुक्त वातावरणासह निरभ्र आकाश आवश्यक असते.
भारी चिकणमाती जमिनीत मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणात करता येते. तथापि, चांगल्या पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते खोल जमीन मोहरी पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे.
वालुकामय व चिकणमाती वाळूची जमीन या शेतीसाठी योग्य असते. मोहरीचे बियाणे पेरण्यापूर्वी पेरणीपूर्व सिंचन करावे लागते. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी सिंचन व्यवस्थित करावे लागते. जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्तम पिक मिळते. जमिनीतील ओलावा कायम असावा लागतो. मोहरीची काढणी शेंगा पिवळ्या पडताच आणि बियाणे कडक वाळताच करावी लागते. मोहरीचे पीक सुमारे 110 ते 160 दिवसात वाढते. शेंगा फुटू नयेत म्हणून सकाळी लवकर काढणी करावी लागते.