
‘आई कुठे काय करते’ मध्ये नेहमीच काहीतरी वेगळे घडत असते. आता या मालिकेत लवकरच नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. आशुतोषची बहीण वीणा या मालिकेत येणार आहे. वीणाविषयी आशुतोषच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ सुरु आहे. तिचा भूतकाळ सुलेखा ताईंसोबत फार चांगला गेलेला नाही. ती परत आल्यावर त्यांना किती दु:ख होईल याची काळजी आशुतोषला आहे. वीणा प्रत्यक्षात घरी आल्याशिवाय तो त्याच्या आईला तिच्या येण्याविषयी सांगणार नाही, असे त्याने ठरविले आहे.
वीणाच्या येण्याची बातमी आशुतोष इतरांना सांगताना ऐकताच सुलेखाताई प्रचंड आनंदित होतात. सुलेखा ताई आशुतोषला पुन्हा एकदा वीणाला फोन करायला सांगतात. अरुंधती यावेळी प्रेमाने सुलेखा ताईना समजावते.

इकडे यश तातडीने अरुंधतीला फोन करतो. बाबा आणि इशामधील झालेला वाद सांगतो. इशा खूप रडतेय असे सांगून बाबांनी इशाला दिल्लीला पाठवायचा निर्णय घेतल्याचे सांगतो. अरुंधती तातडीने ‘समृद्धी’ बंगल्यावर पोहोचते.
इशा खरंच दिल्लीला जाणार का, हे महत्त्वाचे आहेच; त्यासोबतच स्वतःच्या सुखाचा विचार करून दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतलेल्या अरुंधतीच्या आयुष्यात वीणाच्या रूपातून नवीन वादळ येणार आहे का, याबाबत कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.