कृषी अवजारे निर्मिती उद्योग
भारत हा कृषीप्रधान देश आहे. अलीकडे सहज उपलब्ध होत नसणाऱ्या मनुष्यबळामुळे शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. यामुळे कृषी अवजार निर्मिती उद्योगास महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळा’द्वारे विविध कृषी यंत्रसामग्री आणि अवजारांची निर्मिती व विक्री केली जाते. महाराष्ट्रात कृषी अभियांत्रिकी कारखाना चिंचवड येथे असून तेथे ‘कृषीउद्योग’ या नावाने कृषी अवजारांची निर्मिती केली जाते.

कृषीवेटर, ट्रॅक्टर, ट्रेलर आणि पॉवर टिलरसारखी मशागतीची अवजारे बनविली जातात. या उद्योगास ‘कृषी ॲग्रो इंजिनिअरिंग’ असे म्हणतात. नांगर, ट्रॅक्टर, बियाणे पेरणी यंत्र, कापणी – मळणीचे यंत्र, साफसफाईचे यंत्र अशा प्रकारच्या यंत्रांचे उत्पादन आणि निर्यात केली जाते. शेतकऱ्यांच्या गरजा हेरून सर्वोत्तम साधने बनवावी लागतात. एकसमानता आणि मजबूत कार्यप्रदर्शन सुनिश्चित करून उच्च दर्जाची उत्पादने तयार करावी लागतात. उत्पादित केलेली उपकरणे आणि साधने, त्यांची कार्यक्षम रचना याबाबत दक्ष रहावे लागते. मोठ्या उद्योगांमध्ये प्रयोगशाळा असतात. यामध्ये उत्पादन सुधारणा, नवीन उत्पादन विकास आणि गुणवत्ता यांची तपासणी सुनिश्चित केली जाते.
वितरकांच्या नेटवर्कद्वारे बाजारपेठेमध्ये ही यंत्रे वितरीत केली जातात. यामुळे ही उत्पादने दुर्गम ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. विक्रीचे हे नेटवर्क ग्राहकांची सेवा आणि अतिरिक्त गरजा ओळखून उत्पादकांपर्यंत पोहोचविली जाते. भारतातील अनेक उद्योग त्यांची उत्पादने मध्य पूर्व भाग, पूर्व आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि बांगलादेशसारख्या विकसनशील देशांमध्ये मोठ्या संख्येने निर्यात करतात.

अनेक उद्योग नवीन उत्पादने सादर करून कंपनीचा नाविन्यपूर्ण गाभा कायम ठेवण्याच्या प्रक्रियेत आहेत. ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या वस्तुंचे उत्पादन कल्पकतेने केले जाते. या उद्योगांमध्ये गुणवत्ता राखण्यासाठी, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी वितरण प्रणाली अभ्यासावी. ग्राहकांच्या समाधानाचे निरीक्षण करावे. खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने कमी खर्चात चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. गुणवत्ता उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील रहावे.