
चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या ‘मूलचेरा’ आणि ‘चार्मोशी’ या दोन तालुक्यांमध्ये वसले आहे. हे मैदानी स्वरूपाचे आहे. ‘चपराळा’ गावावरूनच चपराळा वन्यजीव अभयारण्याचे नाव पडले आहे. या गावाजवळ ‘वर्धा’ आणि ‘वैनगंगा’ नद्यांचा संगम होऊन ती ‘प्राणहिता’ नावाने पुढे जाते. प्राणहिता नदीचे पात्र विस्तीर्ण असून नदीच्या दोन्ही काठाला भरपूर झाडे आहेत.
तेलंगणाला लागून असलेले महाराष्ट्रातील हे अभयारण्य ‘ताडोबा अंधारी’ व्याघ्रप्रकल्प आणि छत्तीसगड राज्यातील ‘इंद्रावती’ व्याघ्रप्रकल्पांना जोडते. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात हे वन आहे.
या अभयारण्यास भेट द्यायची झाल्यास 15 ऑक्टोबर ते 15 जून असा कालावधी आहे. अहेरी हे जवळचे बस स्थानक 40 किमी अंतरावर आहे. बल्लारपूर हे जवळचे रेल्वेस्थानक येथून 65 किमी अंतरावर आहे. जवळचे विमानतळ नागपूर आहे.
चपराळा अभयारण्यात 69 प्रकारचे वृक्ष आहेत. यामध्ये 27 प्रकारच्या वेली व 31 प्रकारच्या गवताच्या प्रजाती आढळतात. 15 झुडूप प्रजाती आणि 73 प्रकारच्या छोट्या – मोठ्या वनस्पतींनी संपन्न असलेल्या या अभयारण्यात सागाव्यतिरिक्त अर्जुन, पळस, ऐन, हिबर, धावडा, तेंदू, मोह, चारोळी, आवळा, बेहडा, अंजन यासारखी मोठी झाडे आहेत. तिखाडी, कुसळी, पवन्या, कुंदा सारख्या गवत प्रजाती या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. बिबट्या, वाघ, अस्वल, रानमांजर, जंगली कुत्रे, चितळ, चौसिंगा, नीलगाय, तळस, रानडुक्कर, हनुमान लंगुर, शेकरू, कोल्हे यासारख्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, धामन, घोरपड, सरडे आढळतात. घुबड, मोर, पिंगळा, पोपट, खंड्या, कबुतर, पांढऱ्या पाठीचे गिधाड, चिरक अशा 193 पेक्षा जास्त पक्ष्याच्या जाती येथे आढळतात. हिवाळ्यात ‘लगाम’ तलाव, ‘उर्शीकूंटा’ तलाव, ‘अनखोडा’ तलाव, ‘मुर्गीकूंटा’ तलावावर चक्रवाक, काळा थिरथिरा, गायबगळे, स्टॉर्क पक्षी भेट देतात. नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या तीन प्रजातींपैकी दोन प्रजाती चपराळामध्ये सापडतात.
वर्धा-वैनगंगेच्या संगमावर वसलेल्या ‘प्रशांत धाम’ मध्ये हनुमान – शिव दैवत आहे.

महाशिवरात्रीमध्ये येथे तेलंगणा आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. चपराळा अभयारण्याच्या हद्दीत ‘चपराळा’, ‘चौडमपल्ली’, ‘चंदनखेडी’, ‘सिंगनपल्ली’, ‘धन्नूर’ आणि ‘मार्कंडा’ ही 6 गावे आहेत. याशिवाय 21 गावे अभयारण्याच्या अगदी लगतच्या जंगलात आहेत. गोंड, गोळकर, माळी हे येथील स्थानिक लोक आहेत. परंपरेने हे लोक दूध, शेती आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. हंगामी तेंदूपत्ता आणि मोहफुले गोळा करून ते विकण्याचे कामही हे लोक करतात. वर्धा – वैनगंगा संगमावर 2 किमी.ची निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली आहे. येथून जवळपास आणखीही बरीच प्रेक्षणीय स्थळे आपण पाहू शकतो.