
कोकण किनारपट्टीवर असलेला ‘सामराजगड’ आजही दुर्लक्षित आहे. मुरुडजवळ असलेला सिद्दीचा जंजिरा किल्ला अनेकांना ठाऊक आहे. मुरुडच्या दक्षिणेला असलेल्या ‘एकदरा’ गावातील ‘सामराजगड’ मात्र अजूनही कित्येकांना माहीत नाही.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीविरुद्ध केलेल्या अनेक मोहिमांचा साक्षीदार असलेला हा दुर्ग आहे. मुरुडचा समुद्रकिनारा ओलांडून दक्षिण टोकाला ‘एकदरा’ खाडीवरील पूल लागतो. या पुलावरून नयनरम्य निसर्गदर्शन होते. येथून पुढे शिवमंदिर असून तिथे गेल्यावर मुरुड गाव, मुरुडचा किनारा आणि किनाऱ्याला समांतर पसरलेली बागायती असे मोहक दृश्य दिसते. कोजी दत्तो यांनी दंडा – राजपुरी आणि आसपासचा प्रदेश काबीज करून येथे किल्ला बांधला. यावर सिद्दीने हल्ला केला. त्याची जवळपास ३०० माणसे मारली जाऊन पराभव झाला. आसपास झाडांवर तोफा चढवून हल्ल्याचा निष्फळ ठरला. टेकडीच्या माथ्याजवळ पोहोचल्यावर समोर भग्न तटबंदी दिसते. जंजिऱ्याच्या सिद्दीचा निःपात करण्यासाठी पेशवे शामराज नीलकंठ यांची नेमणूक झाली होती. त्यांच्या नावाने हा किल्ला ओळखला जातो असे एकंदर दिसते.

‘राजपुरी’च्या खाडीवर सेतू बांधायचे कामही छत्रपती शंभूराजेंनी सुरु केले होते. दुर्दैवाने मुघलांनी त्याच काळात केलेले आक्रमण परतवून लावण्यासाठी दादाजी रघुनाथ देशपांडेंकडे किल्ला सोपवून छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांच्या विरोधात उत्तरेकडे जावे लागले. आजचे ‘राजपुरी’ गाव तिथेच वसलेले आहे.