
कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणास यांत्रिक प्रक्रियेतून चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळा’ची स्थापना सन १९६५ साली झाली. ‘कंपनी अधिनियम १९५६’ अंतर्गत या महामंडळाची नोंदणी करण्यात आली.
हे महामंडळ शेतकरी बांधवांना शेतीमध्ये उच्च उत्पादकता मिळवून देण्यासाठी काम करीत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीची खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी अवजारे आणि पशुखाद्य वेळेवर व किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. हे महामंडळ दाणेयुक्त मिश्रीत खत तयार करण्यामध्ये व्यस्त आहे. महामंडळाचे खत कारखाने पाचोरा (जळगाव), जालना, नांदेड, वर्धा, कोल्हापूर आणि रसायनी (रायगड) येथे आहेत. ‘महाराष्ट्र कीटकनाशके मर्यादित’ या सहाय्यक कंपनीमार्फत महामंडळ किटकनाशके तयार करते. या सहाय्यक कंपनीचे कारखाने अकोला आणि रत्नागिरीतील ‘लोटे परशुराम’ येथे आहेत. आपली खते आणि किटकनाशके ‘कृषी उद्योग’ या ब्रँडच्या नावाखाली विक्रीस काढते.

महामंडळाची कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा चिंचवड येथे असून येथे ट्रॅक्टरने चालविल्या जाणारी अवजारे बनवितात. महामंडळाचा पशुखाद्य तयार करणारा कारखानाही चिंचवड येथे आहे. येथे पौष्टिक पशुखाद्य तयार करून विकले जाते. नागपूर येथे फळांचा रस, सिरप, जाम, केचप, इत्यादी तयार केल्या जाणारा प्रक्रिया उद्योग आहे. ‘नोगा’ या ब्रँडखाली ही उत्पादने विकल्या जातात. ‘नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन’ यापासून तयार झालेला ‘नोगा’ हा शब्द आहे. महाराष्ट्र शासनाने ‘नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन’ हे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या ताब्यात सन १९७२ मध्ये दिले.
महामंडळाचे मुख्यालय मुंबईत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर १२ प्रादेशिक कार्यालये रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे आहेत.
हे महामंडळ उद्योजकांना प्रकल्प तयार करण्यास आणि क्षेत्र निवडण्यास मदत करते. नागपूरजवळ ‘बुटीबोरी’ येथे ‘फूड पार्क’ देखील विकसित केले आहे.