पपई प्रक्रिया उद्योग
महाराष्ट्राच्या खानदेशातील नंदुरबार जिल्हा हा ‘पपई प्रक्रिया उद्योगा’साठी प्रसिद्ध आहे. देशातील सर्वात मोठा ‘पपई हब’ म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. येथील शेतकरी पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. येथील पपईला भारताच्या वेगवेगळ्या भागातून मोठी मागणी असते.
सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईचे उत्पादन घेतले जाते. पपई विक्री करताना लहान आकाराच्या पपया विकल्या जात नाहीत. अशा पपया ‘पपई प्रक्रिया उद्योग’ करणारे व्यावसायिक विकत घेतात. त्यावर प्रक्रिया करून ‘चेरी’, दूध तसेच इतर खाद्यपदार्थ बनवून त्याची विक्री करतात. हा उद्योग वर्षभर नसून फक्त चार महिने सुरू असतो.

नंदुरबार जिल्ह्यात ‘पपई प्रक्रिया उद्योग’ सुरू केल्यामुळे अनेकांना चांगला रोजगार मिळाला आहे. येथील काही उद्योगांमध्ये पपईचे दूध काढून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. हे दूध औषध कंपन्या विकत घेतात.
पपईचे दूध काढल्यानंतर तिची साल काढून मोठ्या हौदात मिठाचे पाणी करून त्यात टाकले जाते. त्यावर प्रक्रिया करून चेरी आणि इतर पदार्थ बनविले जातात. पपईपासून गर किंवा भुकटी तयार करण्याचे तंत्रज्ञान सोपे असून, त्याला पेय उद्योगामध्ये मोठी मागणी आहे.
ज्या विभागामध्ये पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, अशा ठिकाणी प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर तयार करणे गरजेचे आहे. नंदुरबारसारख्या मोठ्या पपई हबमध्ये ‘पपई प्रक्रिया उद्योग’ मोठ्या प्रमाणात उभे राहिले नाहीत. पपईवरील मोठे संशोधन केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पूर्ण पिकलेल्या पपईपासून गर वेगळा केला जातो. त्यापासून त्वरित तयार करता येणारी पेय बनवता येतात. पूर्ण पक्व फळे काढल्यानंतर स्वच्छ केली जातात. त्यांची साल काढून ‘फ्रूट क्रशर’ किंवा घरगुती ‘मिक्सर’द्वारे गर बारीक करून घेतला जातो. चाळणीतून गाळून घेत त्यातील तंतूमय पदार्थ वेगळे काढले जातात. या ताज्या गराचा वापर विविध पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो.
कच्ची हिरवी फळे किंवा चीक काढल्यानंतर राहणारी फळे ही ‘पेक्टिन’ निर्मितीसाठी वापरता येतात. हिरव्या पपईमध्ये कोरड्या वजनाच्या आधारावर पेक्टिनचे प्रमाण १० टक्के असते. टाकाऊ ठरलेल्या हिरव्या पपईच्या सालीपासूनही ‘पेक्टिन’ मिळवता येते. पेक्टिनचे खाद्य आणि औषध उद्योगामध्ये अनेक उपयोग आहेत.
पपई प्रक्रिया उद्योगातून मिळणारी साल तसेच इतर साहित्यातून गुरांना पौष्टिक चारा मिळतो. ‘पपई प्रक्रिया उद्योगा’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.