हरभरा
‘हरभरा’ अर्थात ‘चणा’ हे सामान्यतः ‘बंगाल हरभरा’ म्हणून ओळखले जाणारे भारतातील सर्वांत महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. चणा कडधान्याखालील सुमारे 35-40 टक्के क्षेत्र व्यापतो. भारताच्या एकूण डाळी उत्पादनात जवळपास 50 टक्के योगदान देतो. मानवी वापरासाठी, तसेच प्राण्यांचे खाद्य म्हणूनही हरभऱ्याचा उपयोग केला जातो. चण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अंदाजे 21 टक्के असते. ज्यात 61.5 टक्के कर्बोदके आणि 4.5 टक्के चरबी असून कॅल्शियम, लोह आणि नियासिनचे प्रमाण जास्त असते.

चणे हे ‘इजिप्शियन वाटाणा’ या नावांनेही ओळखले जातात. हे थंड हंगामातील एक पीक आहे. भारतात ‘देशी चणे’ मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या जातीमध्ये लहान आकार, गडद बिया आणि उग्र आवरण असते. हे चणे काळे, हिरवे किंवा ठिपकेदार असू शकतात. ‘काबुली चणा’ हा फिकट रंगाचा, मोठा आणि गुळगुळीत आवरणाचा असतो.
चण्याच्या उत्पादनासाठी थंड हवामानात किमान 6 ते 8 तास सूर्यप्रकाश मिळू शकेल अशी जागा प्रथम निवडली जाते. पाण्याचा चांगला निचरा होणारी पोषक आणि समृद्ध माती असणारी जमीन निवडली जाते.
चणा हे शेंगायुक्त पीक आहे. म्हणून पेरणीच्या तीन ते चार आठवड्यांपर्यंत ते नायट्रोजनची गरज पूर्ण करून घेते. तथापि, कमी सेंद्रिय पदार्थ आणि कमी नायट्रोजन पुरवठा असलेल्या जमिनींना 20 ते 25 किलो प्रति हेक्टर नायट्रोजनची आवश्यकता भासू शकते. नायट्रोजन व्यतिरिक्त कडधान्ये फॉस्फरसच्या वापरास अनुकूल प्रतिसाद देतात.

जेथे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, तेथे पेरणीपूर्व सिंचन आवश्यक असते. त्यामुळे योग्य उगवण होऊन पिकाची वाढ सुरळीत होते. हरभरा पिकाला फुलोऱ्याच्या वेळी पाणी देऊ नये, तसेच जास्त सिंचन हरभरा पिकासाठी नेहमीच हानिकारक असते; कारण जास्त सिंचनामुळे वनस्पतीवृद्धी वाढून पीक उत्पादनात घट होते. त्यामुळे हलके पाणी द्यावे.
तण नियंत्रण ही एक महत्त्वाची क्रिया आहे. या पिकासाठी तणांचा प्रादुर्भाव ही प्रमुख समस्या आहे. साधारण 25 ते 30 दिवसांनी तण काढावे लागतात. तणनाशकांच्या सहाय्याने तण काढणे हे तणनाशकांच्या वापरापेक्षा श्रेयस्कर आहे. शेतकऱ्यांना साधारणपणे प्रति एकर 8 क्विंटल धान्य मिळते.