
नोकरीस असणारे आई-बाबा बाळाचा जन्म होऊन काही महिने झाल्यावर नोकरी निमित्ताने बाहेर पडतात. बाबा काही दिवस, तर आई काही महिने बाळापाशी असते. मुलाचे अनुभवविश्व फक्त ‘आई’पुरते मर्यादित राहत नाही. आईचीच जागा घेणारी आजी, बाबांची जागा घेणारे आजोबा किंवा पाळणाघरातील काकू, ताई, मावशी यांचा त्यात समावेश होतो. मुलांना पाळणाघराशी लहान वयातच जुळवून घ्यावे लागते. मोठ्यांप्रमाणेच त्यांचाही दिनक्रम सुरू होतो.
या प्रवासात एकापेक्षा जास्त भाषासुद्धा त्यांना अवगत होतात. या मुलांमध्ये वेगवान आत्मविश्वास आपोआप निर्माण होतो. अनेकदा आई – बाबा बरोबर नसल्यामुळे मुले स्वत:च मार्ग काढतात, निर्णय घेतात. स्वत:च्या चुकांमधून शिकतात. आपले आपण बऱ्याच गोष्टी ठरवू लागतात. पुढे पालकांना हे फार त्रासदायक वाटते.
म्हणूनच आई – बाबानी मुलांशी नित्य, नियमित मनमोकळा संवाद साधला पाहिजे. दिवसभरातील घडामोडी, सहवासात आलेल्या इतर व्यक्ती, आनंदाचे प्रसंग मुलांसोबत शेअर करायला हवेत. यावेळेत मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास याविषयी जाणून घ्यावे. काय करावे, कसे वागावे, काय योग्य, काय अयोग्य याविषयी सामंजस्याने बोलावे. मुलांनी टीव्हीवरील कार्यक्रम जास्त पाहू नयेत, असे वाटत असेल, तर पालकांचाही टीव्ही पाहण्याचा वेळ मर्यादित असावा.

प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून त्यांच्यामागे लागणे, टोचून बोलणे, उपहासयुक्त बोलणे टाळावे. मुले मोठी होत असताना प्रत्येक गोष्ट नियमानुसारच केली पाहिजे, असा हट्ट धरू नये. कपडे, केशभूषा, त्यांच्या खोलीची, कपाटाची रचना, व्यवस्था या बाबतीत आपले नियम न लादता फक्त सूचना द्याव्यात. मुलांशी ‘एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’ अशा दृष्टीने वागावे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान होईल अशा कृती, वाक्ये टाळावीत. त्यांच्या चुका अपमानास्पद शब्दात न सांगता प्रांजळपणे प्रेमाने सांगाव्यात.
आजची मुले तंत्रज्ञानाशी लहानपणापासून परिचित झाली आहेत. त्यामुळे ती अतिशय सफाईने ते वापरू शकतात. स्वत:च्या ज्ञानात सहजपणाने भर घालू शकतात. अत्यंत विकृत आणि घातक गोष्टी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचत आहेत. त्यावर लक्ष ठेवावे. मुलाशी बोलताना, त्यांना समजून घेताना आई – बाबांनीही मूल बनावे.