
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सागरकिनारे आहेत. यातील काही किनारे आपल्याकडे गर्दी खेचून आणतात, तर काही किनारे आपल्याच मस्तीत एकांतात दिसतात.
येथील प्रत्येक किनारा अनुपम आहे. मालवणमधील ‘तळाशील किनारा’ हा देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक येत असले, तरीही या किनाऱ्यावर फारशी गर्दी दिसत नाही.

नारळाच्या झाडांनी आच्छादलेला हा सोनेरी वाळूचा लांब पल्ला आहे. निवांत किनाऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा समुद्रकिनारा एक उत्तम ठिकाण आहे. येथील स्थानिक मंडळी विशेषतः युवा वर्ग आवर्जून या किनाऱ्याला भेट देतात. माडांच्या झाडाखाली बसून मस्तपैकी लाटांचे खेळणे अनुभवता येते. समुद्राची गाज ऐकता येते.
कधीतरी या किनाऱ्याला नक्की भेट द्यावी. पर्यटकांची गर्दी नसल्याने छानपैकी एकांतात वाळूत चालण्याचा अनुभव घेता येतो.