
रत्नागिरीतील ‘गणपतीपुळे’ समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या 1 किलोमीटरवर असलेले एक छोटे आणि मनोहर असे ‘मालगुंड’ गाव आहे. प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचे हे जन्मस्थान आहे. अशा या मालगुंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नयनरम्य, विस्तीर्ण असा स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हा किनारा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहेच; सोबत जलक्रीडा, पॅरा मोटरिंगचा आनंदही येथे पर्यटकांना घेता येतो. ‘केशवसुतांची भूमी’ म्हणून येथे अनेक पर्यटक भेट देतात.

या किनाऱ्यावर पर्यटकांची ये – जा असते. मालगुंडमध्ये ‘कवी केशसुत स्मारक’ उभारले आहे. तसेच येथील शांततेमुळे आणि येथे फारसे व्यापारीकरण नसल्यामुळे अनेक पर्यटक गणपतीपुळ्याऐवजी मालगुंडमध्ये राहणे पसंत करतात. मालगुंडमध्ये अनेक खासगी एमटीडीसी मान्यताप्राप्त निवास उपलब्ध आहेत. मालगुंडचा किनारा आल्हाददायक असाच आहे. सागराच्या फेसाळत्या लाटांची गाज ऐकत हे कोकणातील लहानसे गाव शांतपणे कवी केशवसुतांच्या आठवणी गोंजारत उभे आहे.