
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री संत राऊळ महाराजांचा छानसा मठ आहे. सन 1905 मध्ये कोजागिरी पौर्णिमेला हे सिद्धपुरुष जन्मास आले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 4 भाऊ आणि 4 बहिणींमध्ये ते सर्वात मोठे होते. त्यांचे वडील अप्पा राऊळ आणि आई सावित्रीबाई यांनी त्यांचे नाव ‘कृष्ण’ ठेवले. बालपणी प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे कृष्णाने शिक्षण घेतले नाही. मोठे झाल्यावर शेती किंवा इतर कोणतेही काम करण्यात रस दाखवला नाही. भक्तिगीते गाणे हाच त्याचा छंद होता. गात असताना हे बालक तहानभूक विसरून जायचे.
जरा मोठा झाल्यावर त्याला काम शोधण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले. 2 -3 नोकऱ्या केल्यावर त्यांच्या एका मालकाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये नोकरीसाठी शिफारस केली. त्याच दरम्यान प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या राधाबाईशी कृष्णाचे लग्न लाऊन देण्यात आले. लग्नानंतर कृष्णा भजनगाणे बंद करेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या समजून घेईल, असे त्यांच्या आई-वडिलांचे मत होते. कामावरून परत आल्यावर पहाटेपर्यंत घरी भजने गाणे त्याने सुरू ठेवले. यामुळे शेजाऱ्यांना त्रास होऊ लागला. ते दुसऱ्या दिवशी पत्नीशी भांडण करू लागले. तक्रारी वाढल्यानंतर ते आपली खोली बदलून त्याच परिसरात इतरत्र जाऊ लागले.

याच तक्रारींमुळे त्यांना अशा 34 खोल्या बदलाव्या लागल्या. दरम्यान, राधाबाईंचा पिंगुळी येथे मृत्यू झाला. कृष्णाने माझगाव येथे सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज यांची भेट घेतली, आणि ते त्यांचे मुख्य शिष्य बनले. श्री बाळकृष्ण महाराजांनाही आबांच्या दर्जाचा शिष्य मिळाल्याने खूप आनंद झाला. काही वर्षांतच आबा मुंबईला निरोप देऊन पिंगुळीला परत आले. इथे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याऐवजी ते गावोगाव फिरू लागले, भक्तिगीते गाऊ लागले. जिथे गेले तिथे भक्तीगीतांची मालिका चालू राहिली. अविश्वसनीय चमत्कार घडू लागले. आबांचे दर्शन घेण्यासाठी लोक पिंगुळीला जाऊ लागले. लोकही त्यांना ‘महाराज’ मानू लागले, कारण त्यांचा शब्द कधीच फसला नाही. भजने गाण्याबरोबरच त्यांनी वर्षभरात सलग 2 ते 3 महिने अन्न-पाणी न घेता दोनवेळा ध्यान केले. त्यानंतर, ते मुंबई आणि इतर ठिकाणी भेट देऊ लागले. भक्तांच्या समस्या सोडवू लागले. त्यांनी आपल्या हयातीत मृत व्यक्तींना जिवंत करणे, प्रसंगी पेट्रोलऐवजी पाण्यावर वाहने चालवणे, मुंबईला जाणारी बोट गोव्यात मानसिक शक्तीने धरून परत आणणे असे महान चमत्कार केले.
सद्गुरु या नात्याने त्यांचे मुख्य उद्दिष्ट भक्तांना मोक्ष मिळवून देणे हे होते. 31 जानेवारी 1985 रोजी माहीम येथे त्यांनी देह सोडला. त्यांना 2 फेब्रुवारी 1985 रोजी पिंगुळी येथे समाधी देण्यात आली. आजही त्यांची प्रचिती त्यांची भक्तमंडळी घेतात. राऊळ महाराजांनी भक्तांना कधीही निराश केले नाही. आजही या मठात भक्तमंडळी मोठ्या श्रद्धेने येतात. येथे जायचे झाल्यास जवळचे रेल्वेस्थानक कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ स्थानक आहे. जवळचे विमानतळ चिपी आणि गोव्यातील मोपा हे आहे.