
तरुणपणी मनुष्याला कुणाची गरज लागत नाही, परंतु जीवनाच्या एका टप्प्यावर नाती आठवू लागतात. अलीकडे आजारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, यात केवळ वैद्यकीय उपचार करून होत नाही, तर पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. सेवा करणारी माणसे भोवताली असावी लागतात. काही वेळा मृत्यू समोर आल्याचे दिसत असते. दरम्यानचा काळ चांगला जाण्यासाठी जवळची माणसे भोवती असावी लागतात. या माणसांना त्या व्यक्तीची सेवा ही करावीच लागते. अपवाद वगळता अजूनही भारतात ही व्यवस्था चांगली आहे.
घरात अंथरुणावर असलेली आजारी व्यक्ती असल्यास वैद्यकीय उपचाराबरोबरच त्यांच्या इतर गरजांनाही प्राधान्य द्यावे. उदा. कोणी आप्तेष्ट भेटायला आले असतील तर त्यांना भेटण्याची मोकळीक द्यावी. वैद्यकीय उपचारासाठी हा आनंद हिरावू घेऊ नये. आपण त्यांना वेळ देत नसू, पण इतर कोणी आप्तेष्ट, मित्रपरिवार देत असतील तर त्यांना रोखू नये. वैद्यकीय उपचार हे केवळ पूरक असतात. त्या व्यक्तीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे काय आहे, याची दखल आधी घेतली पाहिजे.

औषधांपेक्षासुद्धा जास्त महत्त्वाचे त्या व्यक्तीविषयी सहानुभूती आणि ममत्व असते. आपल्या आप्तेष्टांमध्ये अशी आजारी व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही ओल्या सहानुभूतीची गरज असते, हे लक्षात ठेवावे.
आजारी व्यक्तीची वेळच्या वेळी स्वच्छता, त्यांना अन्न भरवणे, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. घरात दुर्गंध पसरत असेल, तर तो टाळण्यासाठी धूप, उदबत्ती वगैरेचा उपयोग केला पाहिजे. अंथरुणावर दिवसरात्र पडून राहिल्याने व्यक्तीच्या शरीरावर जखमा होऊ शकतात. त्या वाढत जातात. म्हणून हवेच्या किंवा पाण्याच्या गादीवर व्यक्तीला झोपवावे. दर 15 ते 20 मिनिटांनी कूस बदलल्यास रक्तप्रवाह सुरळीत ठेवला जाऊ शकतो. यासाठी प्रशिक्षित परिचारिका नसली, तर स्वत: या गोष्टी शिकून घेता येतात. स्त्रियांनीच या गोष्टी केल्या पाहिजेत असे नाही, पुरुषही हे काम करू शकतात. आहारातील पदार्थ चावून खाणे शक्य नसेल, तर पातळ पदार्थ भरवून पहावे.
आजारी व्यक्तीच्या आजूबाजूला आयुष्यभर सोबत असणारी त्याच्या जवळची माणसे असली की, त्या व्यक्तीचा अंतिम काळदेखील समाधानाने जातो.