
केंद्रातील मोदी सरकारने भारतात वापरल्या जाणाऱ्या पाकिस्तानमधील 14 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे. हे मोबाईल मेसेंजर ॲप्स दहशतवादी वापरत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
सीमेपलीकडून येणारे हे दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या मालकांशी बोलण्यासाठी या ॲप्सचा वापर करीत होते. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्येच या मोबाइल ॲप्सचा सर्वाधिक वापर झाल्याचे आढळून आले आहे. बंदी घातलेल्या मेसेंजर ॲप्लिकेशन्समध्ये क्रीपवीझर,एनिग्मा, सेफस्वीस, विक्रेम, मीडियाफायर, ब्रायर, बीचट, नंदबॉक्स, कोनियान, आयएमओ, एलिमेंट, सेकंड, रेखा, जंगी आणि थ्रीमा यांचा समावेश आहे.
अलिकडच्या काळात असे आढळून आले आहे की, या ॲप्लिकेशन्सचा वापर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील कामगार आणि इतर कार्यकर्त्यांना कोडेड संदेश पाठवण्यासाठी केला होता. देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या मोबाइल ॲप्लिकेशन्सवरील कारवाई ही काही नवीन घटना नाही. सरकारने यापूर्वीदेखील अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे.
गेल्या काही वर्षात, भारत सरकारने सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सुमारे 250 चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे.
जून 2020 पासून सरकारने 200 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये लोकप्रिय मोबाईलवरील खेळांचाही समावेश आहे.