
मुंबईतील शिवाजी पार्कवर आज ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी भाषणात महाराष्ट्र राज्यासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणादेखील केल्या.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषकाचे यावर्षी ३५० वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर २ ते ९ जून २०२३ काळात ‘शिवराज्य महोत्सव’ आयोजित करण्यात येणार असल्याचे राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.

१ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. सरकारने १९ फेब्रुवारी २०२३ ला ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचा ‘महाराष्ट्र गीत’ म्हणून स्वीकार केला आहे, असे सांगून महाराजांचे जन्मस्थान ‘किल्ले शिवनेरी’वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. पुण्यातील आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार असल्याची घोषणादेखील बैस यांनी केली. वीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिन राज्य सरकारकडून ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचेही यावेळी राज्यपालांनी सांगितले.