
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाचे सदिच्छादूत म्हणून मराठी – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सन २००३ साली ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य सरकार एसटीच्या माध्यमातून प्रवासाच्या विविध सवलती प्रवाशांसाठी लागू करीत असते. या योजनांची माहिती सदिच्छादूताच्या माध्यमातून राज्यातील खेडोपाडी पोहोचवण्यात येते. आता या कामासाठी मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे. ‘सदिच्छादूत’ म्हणून निवड करताना ग्रामीण भागाची जाण असलेला, स्पष्ट वक्ता, दांडगा जनसंपर्क आणि एसटीने प्रवास केलेला असे निकष असतात. त्यासाठी मकरंद अनासपुरे योग्य ठरले.

शासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांनीही स्वागत केले आहे. या पदी निवड झाल्याबद्दल मकरंद अनासपुरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, राज्यात ‘महिला सन्मान योजना’ आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’मुळे एसटीच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. एसटीच्या योजनांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे असल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. महामंडळाने राज्यात स्वच्छ बसस्थानक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 2 कोटींची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.