आता जंगलातील मातीवर डोळा
पालघरमधील ‘वाडा’ तालुक्यात मोठ्या प्रमाणात माती चोरीला गेल्याचे समोर आले आहे. येथील जंगलांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालून मोठमोठ्या झाडांच्या कत्तली केल्या आहेत. आता या चोरट्यांनी जंगलातील मातीकडे लक्ष वळवले आहे. लोहपे गावाच्या वनपट्ट्यातील माती मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे. जंगलातील मातीची चोरी अशीच होत राहिल्यास ती निसर्गाची फार मोठी हानी आहे. येथील वनसंपत्तीचा मूळ आधार माती आहे. असे मातीचे उत्खनन सुरु राहिल्यास भविष्यात भुस्खलनाचे धोके संभवतात. त्यामुळे यावर वेळीच आळा घालणे फार गरजेचे झाले आहे.

तस्करांनी येथील साग आणि खैर या मौल्यवान झाडांच्या प्रजाती जवळपास नाहीशाच केल्या आहेत. आता अनेक दिवसांपासून येथे मातीचे उत्खनन सुरू आहे. मोठ्या प्रमाणातील माती चोरट्यांनी पळविली आहे. याबाबत सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

वनपट्ट्यातील आदिवासी लाभार्थी याबाबत फार जागरूक असतात; परंतु त्यांना ही मंडळी दाद देत नसतात. मातीचे उत्खनन करीत असताना जंगलाचे रक्षण करणारे वनरक्षक कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत तातडीने चौकशी करून बेजबाबदार कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी केली आहे.