
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात ‘मेरी’ ही मुख्यत्वे पाटबंधारे प्रकल्प व इतर बांधकामे या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी संशोधन करणारी संस्था आहे. महाराष्ट्र शासनाने एप्रिल १९५९ मध्ये नाशिक येथे या संस्थेची स्थापना केली.
ही संस्था विविध प्रकल्पांशी संबंधित संशोधनाच्या समस्या हाताळते. तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेले आहे. संस्थेच्या कार्यात जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग समाविष्ट आहेत. ही संस्था स्वतः केलेले संशोधन तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या कामांव्यतिरिक्त केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळ, जलसंपदा मंत्रालय आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयामार्फत केंद्र सरकारद्वारे प्रायोजित केलेल्या संशोधन समस्येचे निराकरण करते. ‘इंडियन नॅशनल कमिटी ऑन हायड्रॉलिक रिसर्च’, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, इ. याव्यतिरिक्त सर्व बांधकाम साहित्य, माती आणि पाण्याची गुणवत्ता इत्यादीची चाचणी देखील संस्थेद्वारे केली जाते. ही संस्था भूकंप निरीक्षणासाठी राज्याची ‘नोडल एजन्सी’ म्हणूनही काम करते.

मृदा यांत्रिकी संदर्भ प्रयोगशाळा, साहित्य चाचणी संदर्भ प्रयोगशाळा, महामार्ग संशोधन विभाग, सामान्य प्रशासन, नागरी बांधकाम देखभाल विभाग हे या संस्थेचे विविध विभाग आहेत.
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पाटबंधारे, वीजनिर्मिती, इमारती, रस्ते व पूल यांची बांधकामे, पाणीपुरवठा योजना, पूरनियंत्रण, बंदरांच्या समस्या, नवीन औद्योगिक वसाहतींची उभारणी वगैरे नानाविध विकास योजना मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित करण्यात आल्या. या सर्व योजनांमध्ये आधुनिक संशोधन, आधुनिक प्रकारची बांधकामाची सामग्री व अभिनव कार्यपद्धती यांचा वापर करण्यात येऊ लागला. त्याद्वारे खर्चात अधिकाधिक बचत करून बांधकाम अधिकाधिक मजबूत करण्यासाठी सतत संशोधन करण्याची जरुरी होती. या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना करण्यात आली. आजही ते काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे.