Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

पद्मदुर्ग किल्ला

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘पद्मदुर्ग’ ऊर्फ ‘कासा’ हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला ‘मुरूड’ गावाजवळील समुद्रात आहे. ‘मुरुड’ हे रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘जंजिरा’ आणि ‘सामराजगड’ किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.

‘राजपुरी’ खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येला साधारण ३ किमी. अंतरावरील एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. निजामशाहीच्या काळात सिद्दी लोकांनी ‘कुलाबा’आणि ‘रत्नागिरी’ या जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन केली. तेथे काही जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले बांधले. ‘दांडा राजपुरी’ हा त्यांपैकीच एक किल्ला होता. हा किल्ला घेण्याचा शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला; पण तो घेणे त्यांना शक्य झाले नाही.

‘दांडा राजपुरी’ कडील सिद्दींची सत्ता वाढू नये, म्हणून शिवाजी महाराजांनी ‘दांडा राजपुरी’ समोर सिद्दीला जरब बसविण्याच्या उद्देशाने नवीन भुईकोट किल्ला बांधला, आणि त्यास ‘पद्मदुर्ग’ हे नाव ठेवले. या किल्ल्याच्या आश्रयाने ‘दांडा राजपुरी’ काबीज करण्याच्या हेतूने पेशवे मोरोपंत पिंगळे सन १६६९ मध्ये ‘दांडा राजपुरी’वर चालून गेले असता, त्या प्रदेशातील शिवाजी महाराजांच्या सुभेदाराने मोरोपंतास आवश्यक सामग्री पुरविली नाही. त्यामुळे ही मोहीम फसली. सुभेदाराने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुढे शिवाजी महाराजांनी एका पत्रातून त्याची खरमरीत शब्दात कानउघाडणी केली.

या किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला असून त्यासमोर पडकोट आहे. पडकोट नामशेष होत आला आहे. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्यासारखा आहे. या किल्ल्याच्या बांधकामात तटबंदीच्या 2 दगडांमध्ये चुना वापरलेला आह. सागरी लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. 2 दगडांमधील चुना अजूनही आहे. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष दिसतात.

पद्मदुर्गावर महाद्वारातून जाण्यासाठी 4 – 5 पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतील बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे होते. हे कार्यालय येथून हलल्यावर देखभाल नसल्याने हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्यासाठी 4 टाक्या केलेल्या दिसतात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *