
सुदानमध्ये परस्परात लढणाऱ्या प्रतिस्पर्धी लष्करी गटांमध्ये शांततेसाठी चर्चा होणार आहे. याकरिता दोन्ही गटांनी आठवड्याभराच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. हा युद्धविराम ४ मे पासून लागू होणार आहे. दक्षिण सुदानने दोन्ही बाजूंमधील हा करार जाहीर केला असून दोन्ही बाजूंनी चर्चेसाठी त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे मान्य केले आहे.
मात्र, याआधी दोन्ही बाजूंनी जाहीर केलेला युद्धविराम टिकू शकला नव्हता. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर करार मोडल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हा युद्धविराम नक्की लागू होईल का, याबाबत साशंकताच आहे.

दरम्यान, सुदानी सैन्य आणि निमलष्करी दल ‘आरएसएफ’ यांच्यात 18 दिवसांपासून सुरू असलेल्या लढाईनंतर अर्ध्या दशलक्षाहून अधिक लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे. राजधानी ‘खार्तूम’मध्ये मंगळवारी जोरदार लढाई सुरूच होती. डार्फरच्या पश्चिम भागातही भीषण लढाई सुरू झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, 15 एप्रिल रोजी लढाई सुरू झाल्यापासून 1 लाखाहून अधिक लोकांनी देश सोडून पलायन केले आहे. ही लढाई थांबली नाही, तर सुदानमध्ये भयंकर विध्वंस होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुदानच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या लढाईत आतापर्यंत 500 हून अधिक लोक मारले गेले असून 4,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.