
महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत गेल्या 4 वर्षांत २५ टक्यांनी वाढ झाली आहे. राज्य वन्यजीव मंडळाची बैठक सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे मूल्यांकन केले जाते. सन २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याबद्दल शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे होत आहे. व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित क्षेत्रात आणि संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह अन्य प्राण्यांचीही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरचित्रप्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
देशात गेल्या 4 वर्षांत वाघांच्या संख्येत ६.७४ टक्के वाढ झाली आहे. वाघांची संख्या २ हजार ९६७ वरून ३ हजार १६७ एवढी झाली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीत अभयारण्य आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हीटीसाठी भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल, तसेच रस्ते प्रकल्पांचे १९ प्रस्ताव सादर करण्यात आले.