
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात ‘वेळणेश्वर’ गावाजवळ ‘शास्त्री’ नदीच्या उत्तरेला वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा फार सुंदर आहे. खडकाळ समुद्र आणि स्वच्छ वातावरणासाठी तो लोकप्रिय आहे. पोहणे, सूर्यस्नान आणि मनमुरादपणे समुद्रकिनाऱ्यावरचे फिरणे यासाठीच पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात. या समुद्रकिनाऱ्यावर तयार झालेली ‘ब्राह्मण घळ’ देखील पाहण्यासारखी आहे.
येथे प्राचीन वेळणेश्वर मंदिर असून ते पाहण्यासारखे आहे. या मंदिरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. या किनाऱ्यावर गेल्यास अंजनवाले किल्ला, व्याघ्रंबरी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि उमा महेश मंदिर ही आणखी काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. गुहागरपासून जवळ असलेले ‘हेदवी’ गाव हे समुद्रकिनारे, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध असल्याने ते सुद्धा पाहण्यासारखे आहे.

या किनार्येजवळची खडकांची रांग तसेच डोंगराच्या पोटात समुद्र घुसल्यानेत्याची झीज होऊन निर्माण झालेले वेगवेगळे आकार, त्यावर समुद्री जीवांनी केलेले नक्षीकाम आणि शिंपले फार सुंदर दिसतात. येथे वळसे घेत येत असलेली नदी समुद्रास मिळते. अशी रमणीय दृश्ये या किनाऱ्यावर पाहता येतात.