
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाच्या ‘आनंद सागर’ मधील बंद असलेले आध्यात्मिक केंद्र आज दिनांक ४ मे पासून सुरू होणार आहे. येत्या काळात टप्प्याटप्प्याने ‘आनंद सागर’ सुरू करण्यात येणार आहे. हे अध्यात्मिक केंद्र सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत निःशुल्क सुरू असणार आहे.
सन 2001 साली तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ‘आनंद सागर’ या केंद्राची सुमारे साडे तीनशे एकरवर उभारणी केली होती. अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव जगाच्या नकाशावर पोहोचले. मध्यंतरी संस्थानाने काही कारणास्तव ‘आनंद सागर’ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून ‘आनंद सागर’ मधील फक्त आध्यात्मिक केंद्र सुरू होणार आहे.

‘आनंद सागर’ सुरू झाल्यानंतर देशभरातील लाखो पर्यटक दररोज ‘आनंद सागर’ची अध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी येऊ लागले होते. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच गेली. खरे तर ही पडिक जमीन होती. संस्थानाने सरकारकडून ही जागा भाडेतत्त्वावर घेऊन विकसित केली आहे. आता येथील मंदिरे आणि आध्यात्मिक केंद्राचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून ‘आनंद सागर’ बंद होते. आता येथे काही भागात दुरुस्ती करून रंगरंगोटी सुरू आहे.