बोराची शेती
अत्यंत दुष्काळी भागातील कोरडवाहू फळशेतीत ‘बोराची शेती’ हे वरदान आहे. बोर हे कमी खर्चात मिळणारे कमी मेहनतीचे फळझाड आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात हे फळपीक प्रामुख्याने घेतले जाते. बोराचे झाड कणखर, काटक असून दुष्काळी परिस्थितीत देखील जगते.

बोरांच्या काटेरी फांद्यांचा कुंपणासाठी तर लाकडांचा बांधकामासाठी उपयोग होतो. बोराचे साल आणि पानातील टॅनीनचा कातडी बनविण्याच्या उद्योगात उपयोग केला जातो. बोराचे फळ खाल्याने रक्तशुद्धी होते. पचनक्रियेला मदत होते. बोराची पद्धतशीर शेती अभावानेच पहायला मिळते.
अत्यंत हलक्या, डोंगरउताराच्या जमिनीत उत्पादन देणारे पीक म्हणजे बोर आहे. बोरामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. शिवाय भरपूर प्रथिने, कर्बोदके आणि खनिजद्रव्य असल्याने ते अत्यंत पौष्टिक फळ आहे. बोरापासून जॅम, सुकविलेली बोरे, सरबत, पावडर, बिस्किट इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.
महाराष्ट्रात 9636 हेक्टर क्षेत्रावर बोराची लागवड झाली आहे. उष्ण आणि कोरड्या हवामानात बोराची वाढ चांगली होते. हवेमध्ये जास्त आर्द्रता असल्यास बोराची निकोप वाढ आणि फळधारणा बरोबर होत नाही. डोंगर उताराच्या जमिनीबरोबरच वालुकामय, रेताड किंवा क्षारयुक्त जमिनीत तसेच दलदलीच्या जमिनीतही बोर लागवड करता येते. अतिआर्द्रतेच्या परिस्थितीत या पिकावर रोग व किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. फळे तयार होण्याच्या सुमारास उष्ण व कोरडी हवा असल्यास फळे चांगली येतात.

बोराच्या झाडाला भरपूर सोटमुळे असतात. त्यामुळे ती जमिनीत खोलपर्यंत जातात. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत बोराचे झाड चांगले वाढू शकते. ‘गोला’, ‘सफेदा’, ‘सेब’, ‘कैथाली’, ‘सन्नुर नं. 5’, ‘छुहारा’, ‘कडाका’, ‘उमराण’, ‘मेहरुण’ या बोराच्या विविध जाती आहेत. महाराष्ट्रात ‘उमराण’, ‘कडाका’, ‘छुहारा’ व ‘इलायची’ या सुधारित जाती उत्तम ठरल्या आहेत.
बोराच्या झाडावर जून – जुलै महिन्यात फुलधारणा होऊन नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात फळे तयार होतात. फुलधारणेपासून साधारण 120 ते 125 दिवसात फळे पक्व होतात. ओलिताखाली असल्यास उशिरा तोडणीस तयार होतात.