
सततची बर्फवृष्टी आणि खराब हवामान यामुळे केदारनाथ यात्रा बुधवारी प्रथमच स्थगित करण्यात आली. ‘सोनप्रयाग’ आणि ‘गौरीकुंड’सह इतर थांब्यांमधून प्रवाशांना पुढे जाण्याची परवानगी दिली नाही. यामुळे 14 हजारांहून अधिक यात्रेकरू विविध मुक्कामावर थांबले आहेत. प्रवाशांना राहण्यासाठी लावण्यात आलेले अनेक तंबूही तुटले, काही बर्फाने झाकले गेले. गुरुवारी यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबतही संभ्रम आहे. पोलीस महासंचालक अशोक कुमार आणि जिल्हा दंडाधिकारी रुद्रप्रयाग मयूर दीक्षित यांनी हवामानानुसार याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

‘गंगोत्री’ आणि ‘यमुनोत्री धाम’ मध्येही दुपारपर्यंत पाऊस झाला. ‘बद्रीनाथ धाम’ मध्ये बर्फवृष्टी सुरूच होती. मात्र, तिन्ही धामांच्या यात्रेवर याचा परिणाम झाला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ‘केदारनाथ धाम’सह संपूर्ण खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर कडाक्याच्या थंडीने ग्रासला आहे. ‘केदारनाथ’ वरील चिखल आणि निसरड्या रस्त्यामुळे त्रास वाढला आहे. मंगळवारी दिवसभर बर्फवृष्टी झाली. पोलीस प्रशासनाने यात्रेकरूंना ‘सोनप्रयाग’ आणि ‘गौरीकुंड’ येथून पुढे जाऊ दिले नाही. सोमवार आणि मंगळवारीही पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रेत व्यत्यय आला होता. पोलीस महासंचालक अशोक कुमार आणि रुद्रप्रयागच्या पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा अशोक भदाणे बुधवारीही धाममध्ये उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी भाविकांना आवाहन केले की, केदारनाथमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत आहे त्यामुळे हवामानाचा अंदाज पाहून प्रवास करावा.