
मणिपूरमध्ये आदिवासी आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याशी फोनवर बोलून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. केंद्र मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ईशान्येकडील राज्याच्या हिंसाचारग्रस्त भागात तैनातीसाठी ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ची पथके पाठविली असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना एकंदर परिस्थिती आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. संवेदनशील ठिकाणी लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान आधीच तैनात करण्यात आले आहेत. या दोन दलांव्यतिरिक्त, निमलष्करी दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने मणिपूरमध्ये हिंसाग्रस्त भागात तैनात करण्यासाठी उपस्थित आहेत.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ‘आरएएफ’च्या पाच कंपन्यांना हवाई दलाच्या विशेष विमानाने इंफाळला पाठवण्यात आले आहे, तर 15 इतर जनरल कंपन्यांना राज्यात तैनातीसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 15 कंपन्या मणिपूरमध्ये तैनातीसाठी हजर आहेत.
‘मेईतेई’ समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आदिवासी करीत आहेत. विशेष म्हणजे याच्या निषेधार्थ बुधवारी ‘चुरचंदपूर’ जिल्ह्यातील ‘तोरबांग’ भागात विद्यार्थी संघटनेने ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढला. यादरम्यान हिंसाचार झाला. या रॅलीत हजारो आंदोलक सहभागी झाले होते. त्यावेळी ‘टोरबांग’ भागात आदिवासी आणि गैरआदिवासी यांच्यात संघर्ष झाला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.