गो फर्स्टच्या निर्णयानंतर विमान प्रवास महागला
‘गो फर्स्ट’ या कंपनीने विमान उड्डाणे रद्द करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागपूर-मुंबई विमान प्रवास महागला असून प्रवाशांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 2 दिवसांपासून वाढीव तिकीट दरामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ‘गो फर्स्ट’ची उड्डाणे रद्द झाल्यानंतर इतर कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात कमालीची वाढ केली आहे.

प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी लोक विमान प्रवासाला प्राधान्य देत असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने अनेक नागरिक प्रवासासाठी बाहेर पडत आहेत. आता तिकीटांच्या दरात तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळावरून सर्वाधिक तिकीटाचे दर आकारले जात आहेत. आधी मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी आकारले जाणारे रुपये ४,५०० ते ५००० या दरांची जागा आता रुपये १२,००० ते १८,००० रुपयांनी घेतली आहे.

‘गो फर्स्ट’ ची उड्डाणे रद्द झाल्यानंतर इतर कंपन्यांनी त्याचा लाभ घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. नागपूर-मुंबईची ६ विमाने रद्द झाली असून 36 ऐवजी 30 विमानाचे संचलन होत आहे.