मुंबई-पुणे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
मुंबई-पुणे प्रवासादरम्यान लोणावळा आणि खंडाळा शहरांमधून जाणारी अवजड वाहने आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका वर्षापूर्वी सकाळी 7 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान खंडाळा घाटातून अवजड वाहनांना पूर्णत: बंदी घातली होती.

मात्र, या आदेशाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्यामुळे लोणावळा, खंडाळा शहरांमधून जाणारी अवजड वाहने ही जुन्या राष्ट्रीय महामार्गाने खोपोलीकडे जातात. त्यामुळे, आता खंडाळा घाटातील ‘मॅजिक पॉइंट’ येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीकडे जाणाऱ्या आणि खोपोलीहून लोणावळ्यात येणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या परिसरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी अनेक लहान आणि अवजड वाहने ‘मॅजिक पॉइंट’ येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीकडे तसेच पुढे कर्जतमार्गे कल्याण, ठाणे व मुंबईकडे जातात. मात्र, हा मार्ग अवजड वाहनांसाठी धोकादायक आहे. खंडाळा घाटातील तीव्र उतार आणि नागमोडी वळणाचा रस्ता; तसेच काही ठिकाणी वळणाचा, मोठ्या चढणीचा रस्ता आहे. यामुळे घाटातील शिंग्रोबा मंदिर परिसरात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

खंडाळा घाटात शिंग्रोबा मंदिराजवळील दरीत ढोल-ताशा पथकाची बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात १४ जणांचा बळी गेला होता. या घटनेनंतर महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, रस्ते विकास महामंडळ, आदी सर्व यंत्रणांनी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. आता अवजड वाहनांना रोखण्यासाठी येथे ‘हाइट बॅरिकेड’ लावण्यात आले आहेत.