Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

काश्मीरबाबतच्या भूमिकेत कोणताही बदल नाही

‘शांघाय सहकार्य संघटने’च्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारतात हजेरी लावली. या भेटीमुळे भविष्यात दक्षिण आशियातील चर्चेचा मंच तयार होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी यांचे म्हणणे आहे. दरम्यान, भारतात आलेले बिलावल भुट्टो काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी एका मुलाखतीत भुट्टो यांनी ‘भारत आणि काश्मीरबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही’ असे मत व्यक्त केले आहे.

सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत – पाकिस्तान संबंध कधीच चांगले राहिले नाहीत, परंतु 2019 मध्ये काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील बोलणी पूर्णपणे बंद आहेत. भारत प्रशासित काश्मीरमध्ये इस्लामिक अतिरेक्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप पाकिस्तानवर करणाऱ्या भारतानेही यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. तब्बल 12 वर्षांनंतर पहिल्यांदा पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी भारताला भेट दिली. दोन्ही देशातील संबध तणावाचे असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आक्रमक झाले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या भविष्यातील संबंधाकडे तुम्ही कसे पाहता, असा प्रश्न भुट्टो यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी भारताने 05 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय माघारी घेतला जात नाही, तोपर्यंत द्विपक्षीय बैठक शक्य नसल्याचे सांगितले. चर्चेसाठी पूरक वातावरण निर्माण करणे ही भारताची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तान शांघाय सहकार्य बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असून, यादरम्यान कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय बैठक होणार नसल्याचे यापूर्वी आम्ही स्पष्ट केल्याचे भुट्टो यांनी सांगितले.

पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यात पाकिस्तानचा संबध असल्याची शक्यता समोर आली आहे. याबाबत भुट्टो यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुट्टो म्हणाले, ”पाकिस्तान हिंसेचे केव्हाच समर्थन करत नाही. दहशतवादाचा मी देखील एक शिकार आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशात पाकिस्तानने दहशतवादामुळे सर्वाधिक नुकसान सहन केले आहे.”

बिलावल भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान देखील होऊ शकतात, अशी शक्यता असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर भुट्टो यांनी निवडणुकीनंतर अशा प्रश्नांना अर्थ असल्याचे सांगितले. दरम्यान, शुक्रवारी बैठकीत भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे जयशंकर यांनी सांगितले; तर दहशतवादावर बोलताना “आपल्या लोकांची सुरक्षा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राजनैतिक साधन म्हणून दहशतवादाला मुद्दा बनवू नये”, असे बिलावल भुट्टो म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान काश्मीरच्या संपूर्ण भागावर दावा करतात, परंतु प्रत्येकाच्या नियंत्रणाखाली एक छोटासा भाग आहे. सन 2019 मध्ये भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. त्यानंतर पाकिस्तानची नाराजी आणखी वाढली. संघर्षाचे हे मुद्दे असूनही ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याकडे सकारात्मक घडामोडी म्हणून पाहिले गेले. तथापि, त्याच वेळी ही संधी या शेजाऱ्यांमधील संबंध सुधारण्यात अपयशी ठरली. पाकिस्तानमधील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी इम्रान खान यांनी यापूर्वीच त्यांच्यावर ‘काश्मीर प्रश्नावर’ तडजोड केल्याचा आरोप केला आहे. गोव्याला रवाना होण्यापूर्वी बिलावल भुट्टो यांनी ट्विटरवर लिहिले, “मी एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचा माझा निर्णय हे संघटनेच्या तत्त्वाशी पाकिस्तानच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.”

सन 2001 मध्ये, मध्य आशियाई देशांमधील सुरक्षा आणि आर्थिक मुद्द्यांवर सहकार्यासाठी ‘एससीओ’ संघटनेचा पाया घातला गेला. पाकिस्तानचा प्रमुख मित्र चीन यामध्ये नेतृत्व करीत आहे. भारत, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान हेदेखील या गटाचे सदस्य आहेत.

दरम्यान, पाकिस्तानच्या गरिबी निर्मूलन आणि सामाजिक सुरक्षा मंत्री शाझिया मारी यांनी सांगितले की, ”आम्ही प्रादेशिक शांतता, समृद्धी आणि विकासासाठी योगदान देण्याकरिता संघटनेच्या बैठकांमध्ये सहभागी झालो आहोत. या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती पाकिस्तानच्या हितसंबंधांचे संरक्षण सुनिश्चित करेल. गोव्यातील बैठकीत पाकिस्तानचा सहभाग हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संपर्क नाही. ही बैठक बहुपक्षीय संदर्भात होत आहे, जेणेकरून पाकिस्तान आपली वचनबद्धता पूर्ण करेल.”

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *