Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

घोडबंदर किल्ला

ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ‘उल्हास’ नदीच्या किनाऱ्यावर घोडबंदर किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला नंतर मराठ्यांच्या ताब्यात गेला. याठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत. त्यामुळे या जागेला ‘घोडबंदर’ हे नाव पडले.

या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ‘ककाबे दी तन्ना’ असे होते. इसवी सन १७३७ पर्यंत या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. तेव्हा त्यांनी इथे बांधलेले चर्च  अजूनही अस्तित्वात आहे. आज त्याचा वापर हॉटेल म्हणून करतात. सध्या या किल्ल्याची अवस्था वाईट आहे.  या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काही प्रयत्न शासनाकडून चालू आहेत. हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येतो. घोडबंदर किल्ल्याची पूर्ण तटबंदी आजमितीस शिल्लक नाही. तटबंदीच्या दुरवस्थेमुळे किल्ल्याला किती आणि कुठे प्रवेशद्वारे होती, हे कळणे जरा कठीणच आहे. तथापि किल्ल्यात जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने वर गेल्यानंतर तीन बाजूने इमारत व मधोमध मोकळी जागा असे स्वरुप असलेल्या इमारतीच्या भिंती आहेत.

हा बुरुज स्पष्टपणे किल्ल्याच्या अंतर्भागात आहे. याचा अर्थ हा बुरुज फक्त टेहळणीसाठीच बांधला गेला असावा. घोडबंदर किल्ल्यातील या बुरुजात वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. पोर्तुगीज शैलीचे दरवाजे असून त्याचे ‘कमानयुक्त’ व ‘वक्राकार शीर्षयुक्त’ असे दोन उपप्रकार पडतात. या दोन्ही प्रकारचे दरवाजे येथे आढळतात. ‘घोडबंदर’ किल्ल्याला लागून असलेल्या खाडीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. वसई ते ठाणे जलमार्गावरील किल्ला म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व होते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *