लिंबू शेती
महाराष्ट्रातील फळझाडांच्या लागवडीत लिंबूवर्गीय फळझाडे अग्रेसर असून भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. भारत हे मूळ स्थान असलेल्या लिंबाची शेती शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आहे. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मोसंबी, संत्रा आणि कागदी लिंबू यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळझाडाच्या लागवडीस पोषक आहे. अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर या कोरड्या हवामानाच्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर लिंबाची शेती केली जाते. त्या खालोखाल पुणे, यवतमाळ, नाशिक, सांगली, नागपूर, धुळे आणि बीड यांचा क्रम लागतो. कोकणात कागदी लिंबाची लागवड आढळून येत नाही. या फळाचे ‘कागदी लिंबू’ आणि ‘साखर लिंबू’ असे दोन प्रकार भारतात आहेत. यापैकी कागदी लिंबाला जास्त मागणी असल्यामुळे त्याची व्यावसायिक लागवड होते.

या फळाला उबदार, थोड्या प्रमाणात दमट आणि जोराच्या वाऱ्यापासून मुक्त असलेले हवामान फार पोषक असते. कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी आणि क्षार नसणारी जमीन निवडावी. फार खोल तसेच उथळ, पाणथळ, चोपण, रेताड आणि खडकाळ जमिनी या फळाच्या लागवडीसाठी योग्य नाहीत.
लिंबामध्ये लोह आणि ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असते. कावीळ झाल्यास लिंबू कापून त्यावर खायचा सोडा टाकून पहाटे चोखण्यास दिल्या जातो. लिंबाचा रस रुचकर, पचनशक्ती वाढविणारा असून त्वचारोग घालविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. लिंबू आणि मध याचा एकत्रित रस घेतल्यास मेद कमी होतो. पित्त, दाह थांबण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात थोडी साखर टाकून घेतात. लहान मुलांना दूध पचत नसल्यास अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस पाजावा. साखर आणि लिंबाचा रस डोक्यावर घासल्यास उवा जातात.
लिंबाचा रस डोक्याला चोळला असता डोक्यातील कोंडा कमी होतो. लिंबाचा रस, आले आणि मिरीची पूड टाकून घेतल्यास पोटाच्या तक्रारी थांबतात. लिंबाच्या सालीपासून, पानांपासून, छाटलेल्या फांद्यापासून तेल निघते. हे तेल फार महाग असून यापासून तयार केलेल्या कॅल्शिअम सायट्रेट, लाईम ऑईलला परदेशात मोठी मागणी आहे. लिंबाच्या बियांपासून निघणारे तेल साबण उद्योगामध्ये कापडांना रंग देण्यासाठी वापरतात.

‘साई सरबती’, ‘विक्रम’, ‘फूले शरबती’ किंवा ‘प्रेमालिनी’ या जातीची रोपे लागवडीसाठी चांगली आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शोधलेली ‘साई सरबती’ ही लिंबाची जात स्थानिक जातींपेक्षा जास्त उत्पादन देते. कागदी लिंबांची अभिवृद्धी बियांपासून आणि कलमांद्वारे होत असली, तरी कागदी लिंबांची लागवड बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून करावी. बियांपासून तयार केलेल्या रोपात मातृवृक्षाचे १०० टक्के गुणधर्म उतरलेले असतात. त्यामुळे अशी रोपे विषाणूमुक्त असतात. रोपांपासून मिळणारी फळे पातळ सालीची आणि रसाचे प्रमाण जास्त असणारी असतात. बियांपासून रोपे तयार केल्यास बीजांकूर शास्त्रोक्तर पद्धतीने होते. ही झाडे दीर्घायुषी आणि जास्त उत्पादनक्षम असतात.
हे बागायती बहुवर्षीय फळझाड आहे. जेथे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करावी. लिंबाच्या झाडाला पाणी देताना ते झाडाच्या खोडाला लागणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. याकरिता ४ वर्षानंतर झाडांना दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने, तर हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाणी बचतीसोबत अधिक उत्पन्न निघण्यास मदत होते. सुरुवातीच्या 4 ते 5 वर्षांपर्यंत फळे येण्यापूर्वी लिंबांच्या दोन झाडांमधील मोकळ्या जागेत सुरुवातीला आंतरपिके घ्यावीत. शक्यतो कीड आणि रोगाला बळी पडणारी आंतरपिके करू नयेत. झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश, खेळती हवा मिळण्यासाठी आणि झाड मजबूत बनविण्यासाठी लहान वयातच झाडाची छाटणी करून त्यास वळण देणे आवश्यक असते. छाटणी करताना खालील फांद्या जादा न छाटता बाहेरून थोड्याथोड्याच छाटाव्यात.
लिंबावरील फुलपाखरू, नाग अळी, काळी माशी आणि पांढरी माशी, रस शोषण करणारा पतंग या कीटक व किडींचा लिंबावर प्रादुर्भाव होतो. साधारण लागवडीनंतर एका झाडापासून चौथ्या वर्षी ४०० ते ५०० फळे मिळतात. ५ ते ७ वर्षाच्या एका झाडापासून २ ते ३ हजार फळे मिळतात. ‘साई शरबती’ आणि ‘फुले शरबती’ या वाणांपासून त्याहीपेक्षा अधिक फळे मिळतात. फळांचे उत्पादन वर्षाच्या काही महिन्यांत सर्वांत जास्त असते. हा काळ भारतात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा असतो. लिंबू लागवडीचे अर्थशास्त्र हे प्रत्येक बहरापासून मिळणारे उत्पादन आणि बाजारभाव यावर अवलंबून असते.
भारतातील अनेक भागात मांसाहार केल्या जातो. लिंबू हे पचनासाठी उपयुक्त असल्याने या प्रदेशांमध्ये लिंबाला वर्षभर मागणी असते. अशा प्रदेशात लिंबू निर्यात करून अधिक उत्पन्न मिळवता येते.