
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा ११ जून रोजी सुरू होत आहे. यावर्षी माऊलींची पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीतील भोसले कुटुंबाच्या ‘सर्जा-राजा’ बैलजोडीला मिळाला आहे. कर्नाटकमधील राजापूर गावातून ‘खिलार’ जातीची बैलजोडी भोसले कुटुंबाने साडेतीन लाखात विकत घेतली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या भोसले कुटुंब माऊलींच्या सेवेत आहे.
यावर्षीचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा १९२ वा पालखी सोहळा असणार आहे. या पालखी सोहळ्याला लाखो वारकऱ्यांची उपस्थिती असते. सन २००१, २०११ नंतर आता यावर्षी पुन्हा भोसले यांच्या बैलजोडीला हा मान तिसऱ्यांदा मिळाला आहे. रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने ‘खिलार’ बैलजोडी विकत घेतल्याची माहिती संतोष भोसले यांनी दिली.

बैलजोडीची निवड करीत असताना ही बैलजोडी बलवान आणि संयमी आहे का, याची चाचणी घेण्यात आली. हे बैल किमान 10 किलोमीटर चालायला हवेत. रथ, बैलगाडी ओढली पाहिजे, असे निकष पूर्ण केल्याने ही बैलजोडी घेतल्याचे भोसले कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवण्याच्या कालावधीपर्यंत या बैलजोडीची विशेष काळजी घेतली जाते. पेंड, मका, कणीक यामध्ये गावरान तूप टाकून त्याचा खुराक बैलजोडीला दिला जातो.