
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सौदी दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. तेथे त्यांनी त्यांचे अमेरिकचे समकक्ष जेक सुलिव्हन, तसेच यूएई आणि सौदी अरेबियाच्या शीर्ष नेतृत्वाशी बैठका घेतल्या आहेत. वास्तविक, डोवाल एका महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात मध्य – पूर्वेत आहेत. या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे या प्रदेशात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ च्या माध्यमातून चीनच्या वाढलेल्या प्रभावाला आळा बसेल.
भारत, अमेरिका, यूएई आणि सौदी हे चार देश पश्चिम आशियाई देशांना रेल्वे नेटवर्कने जोडण्याच्या मोहिमेवर काम करीत आहेत. हा प्रस्ताव अमेरिकेने दिला असून दक्षिण आशियाला समुद्रमार्गे जोडण्याची योजना आहे. या प्रकल्पात भारताची मोठी भूमिका आहे. भारताने आपले कौशल्य इथे वापरावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. यातून भारताला दुहेरी फायदा होणार आहे. त्याचबरोबर चीनचा प्रभावही कमी होणार आहे. डोवाल यांनी अमेरिका आणि यूएईच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली. मध्य – पूर्वेतील चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे अमेरिकी माध्यमांमध्ये बोलले जात आहे. याचे धोरणात्मक उद्दिष्टे पाहता भारतही या प्रकल्पात स्वारस्य दाखवीत आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, चीनने पश्चिम आशियात आपला राजकीय प्रभाव वाढवला आहे. चीनच्या नेतृत्वाखाली सौदी आणि इराणमध्ये करार झाला असून त्यामुळे भारत सतर्क झाला आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम आशियाचा प्रदेश महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या या प्रकल्पावर जर चर्चा झाली, तर त्याचा थेट फायदा भारताला होऊ शकतो. पश्चिम आशियामध्ये रेल्वेचे जाळे पसरणार असून हा भाग समुद्रमार्गे दक्षिण आशियाशी जोडण्याचीही योजना आहे. हे यशस्वी झाल्यास भारताला तेल आणि वायूचा पुरवठा अतिशय जलद व कमी खर्चात केला जाईल. अशा प्रकारे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांनाही रेल्वे मार्गाने जोडून फायदा होणार आहे. भारताने आपले रेल्वे कौशल्य वापरून पश्चिम आशियातील हा प्रकल्प पूर्ण केला, तर जगात ‘रेल्वे बिल्डर’ म्हणून भारताचा लौकिक वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.