अटल भविष्यनिर्वाह योजना

‘अटल भविष्यनिर्वाह योजना’ ही केंद्र सरकारने सुरु केलेली एक योजना आहे. 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा भविष्यनिर्वाह रक्कम मिळू शकेल. याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा भविष्यनिर्वाह रक्कम मिळू शकेल.

या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे 2015-16 ते 2019-20 सरकारचेही योगदान होते. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे होते.
ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही, आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत, अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही योजना चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एकरकमी परत करण्यात येणार आहे.
ही भारतातील नागरिकांसाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांवर लक्ष केंद्रित करणारी योजना आहे. ग्राहकांच्या योगदानाच्या आधारे 60 वर्षे वयावरील व्यक्तीस त्याने गुंतवणूक केल्याप्रमाणे 1,000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत प्रति महिना भविष्यनिर्वाह रक्कम दिली जाईल. भारतातील कोणताही नागरिक या योजनेत सामील होऊ शकतो.

यासाठी ग्राहकाचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचे पोस्ट ऑफिस किंवा बचत बँक खाते असावे. अर्जदार नोंदणीदरम्यान बँकेला आधार आणि मोबाइल क्रमांक देऊ शकतो. मात्र, नावनोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही.
या रकमेची सध्या माणसाला गरज आहे. वयानुसार कमाईची क्षमता कमी होते. राहणीमानाच्या खर्चात वाढ झाली आहे. ठराविक मासिक उत्पन्न वृद्धापकाळात सन्माननीय जीवनाची खात्री देते. म्हणूनच, या योजनेचा लाभ असंघटीत क्षेत्रातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीने घेतला पाहिजे.