डाळिंब
डाळिंब हे एक आरोग्यवर्धक फळ आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण असते. डाळिंब ही आयुर्वेदिक औषधी फळ आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब बंद होतात. डाळिंबाचे उत्पादन ‘मृग बहार’ आणि ‘आंबे बहार’ या 2 हंगामात घेतले जाते. या पिकावर बुरशीजन्य रोग आढळतात. फळाच्या देठाकडील पृष्ठभागावर रोगाची लागण लवकर होते. तेलकट डाग ही डाळिंब उत्पादनातील प्रमुख समस्या आहे. औषधाच्या पाण्यानेसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे बऱ्याच वेळेला दिसून आले आहे.

फळबागेतील तेलकट डागाचे अवशेष आणि झाडावरील रोगाचे जिवंत डाग या रोगाच्या प्रसारामध्ये प्रमुख भूमिका बजावतात. म्हणून बागेत वेळीच उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ‘गणेश’, ‘जी-१३७’, ‘मृदुला’, ‘आरक्ता’, ‘भगवा’, ‘सोलापूर लाल’ या डाळिंबाच्या काही जाती आहेत. डाळिंबाच्या उत्पादनासाठी बागेची स्वच्छता ठेवावी लागते. बहर येण्यापूर्वी रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी लागते. बागेतील आणि बांधावरील तेलकट डाग व इतर रोगाचे अवशेष जाळून नष्ट करावेत. पानावर आणि फळावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर फवारणी चालू ठेवावी. रोग नसल्यास ३० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

काही बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फळांना तडे जातात. परंतु, पाण्याचा अनियमितपणा हे डाळिंबाच्या फळांना तडे जाण्याचे प्रमुख कारण आहे. पाणी देण्यात जास्त अनियमितपणा झाला, तर ५० टक्के फळे होऊन फळे सडतात. कधी-कधी फळे अपरिपक्व अवस्थेतच गळून पडतात. डाळिंबाच्या बागेवर पाण्याचा ताण पडल्यास फळाची बाह्य साल आणि आतील गर आकुंचन पावतो. त्यानंतर एकदम पाणी दिले तर फळांच्या आतील गर फुगतो. मात्र, फळावरील सालीची प्रसारणशक्ती कमी असल्यामुळे आतील गराचा वाढता दाब सालीवर पडून सालीला तडे जातात. म्हणून पाण्याचा अनियमितपणा टाळला पाहिजे. फळांना तडे पडू नयेत म्हणून माफक, परंतु कमी पाणी द्यावे. जमिनीत जास्त प्रमाणात सेंद्रिय आणि हिरवळीची खते टाकून जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची शक्ती वाढवावी. रोगाची लागण झाल्यावर झाड शेंड्याकडून हळूहळू वाळून पानगळ होते. काही वेळा शेजारील 2 किंवा अधिक झाडे वाळतात. या रोगाची लागण होऊ नये म्हणून डाळींब लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी, शेणखताचा वापर वाढवावा.