
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वीर सैनिकांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
दुर्दम्य साहस, असामान्य शौर्य आणि निपुण युद्धकौशल्याचे दर्शन घडविणाऱ्या वीर सैनिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या टप्प्यात ३७ शौर्य पुरस्कार मंगळवारी प्रदान करण्यात आले. यामध्ये ८ किर्तीचक्र पुरस्कारांचा समावेश होता. त्यात ५ मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले. तसेच २९ शौर्यचक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. यातही ५ मरणोत्तर पुरस्कार होते.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात नक्षलवाद्यांशी लढताना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक आणि सध्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सोमय मुंडे, पोलीस हवालदार रवींद्र नैताम, पोलीस नाईक टीकाराम काटेंगे यांचाही शौर्यचक्र प्रदान करून गौरव करण्यात आला.