
मुंबई परिसरात ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे काही किल्ले आहेत. एके काळी हे किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय खात्याने या किल्ल्यांचे नुतनीकरण केल्यामुळे आजही हे किल्ले दिमाखात उभे अहेत. वरळी-कोळीवाड्यामध्ये आदर्श नगरच्या बसथांब्यावरुन समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी एक अरुंद गल्ली आहे. या गल्ल्लीतून सुमारे 10 मिनिटे चालत गेल्यानंतर वरळीचा किल्ला लागतो. हा किल्ला पोर्तुगीजांनी इसवी सन 1561 साली बांधला. या किल्ल्याच्या भिंती तळभागाकडे अधिकाधिक जाड होत जाणाऱ्या आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस त्रिकोणाकृती बुरुज असून या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा ही खास पोर्तुगीज स्थापत्याची वैशिष्ट्ये या किल्ल्यामध्ये दिसून येतात.
मुंबईच्या बेटांवर एकूण ११ किल्ले होते. त्यापैकी वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर इंग्रजांनी ‘वरळीचा किल्ला’ बांधला. या किल्ल्याचा उपयोग समुद्रीमार्गाने होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी केला गेला.

या भागातून लहान होड्या, जहाजे यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि या भागाचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी इसवी सन १६७५ साली वरळीचा किल्ला बांधला. या किल्ल्याची डागडुजी पुरातत्व खात्याने केली असून त्यामुळे किल्ला सुस्थितीत आहे. किल्ल्यावर पाण्याची विहीर असून त्याच्या बाजूला छोटे मंदिर आणि व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जिना बांधलेला आहे. या जिन्यावरून किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरुन बांद्रा, माहीमपर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात. इसवी सन १७ व्या शतकाच्या अखेरीस समुद्री चाच्यांच्या वाढलेल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी तोफांची योजना केली होती. या किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहता येतो.